

Maharashtra MLC election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असताना, काँग्रेसच्या काही नगरसेवकांच्या ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चर्चेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
काँग्रेसने आधी स्वतःचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष शोधावेत, असा टोला लगावत त्यांनी महायुती सर्व 17 जागांवर विजय मिळवेल, असा ठाम दावा केला.
पूर्व विदर्भातील काँग्रेसचे (Congress) काही नगरसेवक संपर्काबाहेर असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले, याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांनीच याचा शोध घ्यावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील काँग्रेस नगराध्यक्ष गायब असल्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले. स्वतःच्या पक्षातील लोक सांभाळता येत नसतील, तर त्याची जबाबदारी भाजपवर ढकलू नये, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत (MLC Election) महायुतीची ताकद स्पष्ट दिसत असल्याचा दावा करत बावनकुळे म्हणाले की, नागपुरात जवळपास 800 मतांपैकी सुमारे 600 मते भाजप- महायुतीकडे आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुती सर्व 17 जागांवर विजय मिळवेल. जागावाटपाबाबत 99 टक्के सहमती झाली असून केवळ एका जागेचा प्रश्न बाकी आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांमधील वाढत्या खर्चाबाबत चिंता व्यक्त केली असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, प्रचार, प्रवास, वाहनांचा वापर आणि इंधन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे जिथे संख्याबळ स्पष्ट आहे, तिथे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. यासाठी ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, भाजपकडून उमेदवारांची यादी केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. जय पवार यांच्या नावाबाबतचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विकसित भारताच्या संकल्पासाठी जनतेचा पंतप्रधान मोदींवर विश्वास असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले, जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करत राहतील.
काँग्रेसकडून मोदींना ‘महागाई मॅन’ म्हटल्याबाबत विचारले असता त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला. काँग्रेस हा जनतेचा विश्वास गमावलेला पक्ष आहे. नकारात्मकता निर्माण करून संभ्रम पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
राज्यात पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण होण्याच्या चर्चांवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, सुरवातीला काही पेट्रोल पंप चालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या आहेत. योग्य नियोजनामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.