
Nagpur News : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता सर्वांचे लक्ष पालकमंत्र्यांच्या नेमणुकीकडे लागले आहे. त्यात सर्वाधिक हॉट मानल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये सर्वाधिक चुरस आहे.
महायुतीमधील भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही गडचिरोलीवर दावा केला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री कोण होणार हे जाहीरपणे सांगून टाकले आहे. त्यामुळे आता या जागेवर कोणालाच दावा करता येणार नाही.
मुख्यमंत्री सहसा पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेत नाहीत. मात्र ही परंपरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी तोडणार असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. ती त्यांनी उघडपणे बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मान्यता दिली, तर आपण गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारू अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आता महायुतीच्या सर्वोच्च नेत्याची इच्छा कोणाला मोडीत काढता येणार नाही, सोबतच मुख्यमंपदाचा मानही राखावा लागणार आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांच्या विषय आता बंद झाला आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व होते. या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याचे नेते व माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना शेजारच्या भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी गडचिरलीची मागणीसुद्धा केली नव्हती. फडणवीस आमचे नेते आहेत. त्यामुळे ते गडचिरोलीचे पालकमंत्री राहावे, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले होते.
मात्र पुन्हा महायुतीची पुन्हा सत्ता आल्यानंतर धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा केला होता. ही आपला नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रसची मागणी असल्याचा दावाही त्यांनी केला होता. शिवसेना आणि भाजपने या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषणवले असल्याने यावेळी आम्हाला ते द्यावे असे त्यांचे म्हणणे होते. मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे पालकमंत्री होण्याचा मार्गच त्यांचा बंद झाला आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. आता त्यांनी पुन्हा गडचिरोली जिल्हा मागितला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच त्यांच्यावर यावरून टीका केली आहे. गडचिरोली कशाला हवे, मलिदा खायला का? अशी बोचरी टाकी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक मागास व नक्षलग्रस्त ही गडचिरोलीच ओळख पुसून काढायची आहे. देशातील स्टिल सिटी म्हणून गडचिरोलीला विकसित करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. त्यामुळे ते गडचिरोली आपल्याकडे ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.