
Harshawardhan Sapkal Akola : भाजप महायुती सरकारच्या हिंदी भाषाच्या सक्तीच्या अध्यादेशानंतर मराठीसाठी आक्रमक झालेले, राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र आले. हिंदी भाषेचा अध्यादेश माघारी घेतल्यानंतर दोघा ठाकरे बंधूंनी विजय दिवस साजरा केला.
यानंतर ठाकरे बंधूंच्या जवळीक वाढली असून, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज ठाकरेंनी 'मातोश्री'वर हजेरी लावली. यानंतर उद्धव ठाकरे आज 'शिवतीर्था'वर राज ठाकरेंना भेटण्यासाठी पोचल्याची माहिती समोर आली. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राज ठाकरे महाविकास आघाडीत येतील, अशा चर्चा सुरू आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 'मार्मिक' प्रतिक्रिया दिली आहे.
हर्षवर्धन सपकाळ (Harshawardhan Sapkal) हे अकोला इथं दौऱ्यावर आहेत. तिथं त्यांनी गोरक्षकांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या खामगाव दलित तरुणाची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "भाजप आणि मोदींच्या विरोधात लढणाऱ्या कुणाचंही स्वागत आहे. 'जर तर'च्या अनुषंगाने राजकारण होत नाही. आणखी निवडणूक लागायची आहे. त्यामुळे खिचडी जशी, शिजते तशी शिजू द्या".
ठाकरे बंधूंची युती झाल्यास राज ठाकरे हे महाविकास आघाडीत (MVA) येतील का? यावर, 'सध्या तरी महाविकास आघाडीत कुणी नवा भिडू येणार नाही. ठाकरे बंधू एकमेकांचे चुलत भाऊ आणि मावस भाऊ आहेत. त्यांच्या मैत्रीकडे राजकारण म्हणून पाहू नये', असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.
वादग्रस्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा भाजप महायुती सरकार राजीनामा घेतील का? यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी माणिकराव कोकाटेंवर अद्याप कारवाई का नाही? हे कळू शकले नाही. देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या इतिहासातील सर्वात लाचार मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विधिमंडळाला 'डब्ल्यूडब्ल्यूएफ'चा आखाडा केलंय, असा टोला लगावला.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुण्यात रेव्ह पार्टीत अटक केले. त्यात प्रांजल खेवलकर याला रेव्ह पार्टीचा आयोजक म्हणून मुख्य आरोपी केले. यावर बोलताना, खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवलं जात असल्याच्या खडसेंच्या आरोपात तथ्य वाटतं. या प्रकरणात कारवाई एवढी तत्परता कशी?, असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी भारताला 'शेर' बनवायचं आहे, असे भाष्य केले होते. 'मोहन भागवत यांच्या या विधानावर संघाला देशाची रचना बदलायची आहे. त्यातूनच भागवतांचं हे वक्तव्य आलं असावं. संघाला देशात एकाधिकारशाही आणायची आहे. त्यामुळे देशाला 'शेर' बनवण्याची भाषा हे करतायेत', असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.