
Nagpur News, 14 Dec : विधानसभेच्या निवडणुकीत मोठा पराभव झाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे. त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही.
असे असले तरी पटोले यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून नव्हे तर विधिमंडळाचा नेता व्हायचे असल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे आज स्पष्ट केले. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाला आहे. फक्त 16 आमदार काँग्रेसचे निवडून आले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच पटोलेंना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या विजयाचे श्रेय घेतले, त्यांच्यावर पराभवाची जबाबदारी असल्याचे सांगून पटोले यांना आपलाही विरोध असल्याचे सांगून टाकले होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले यांची गच्छंती निश्चित मानल्या जात आहे.
दरम्यान, पराभवाची कारणे आणि प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या नेतृत्वाबद्दल मते जाणून घेण्यासाठी प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला नागपूरला येत आहेत. सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर ते आपला अहवाल पक्ष श्रेष्ठींकडे सादर करणार आहेत. पटोले यांचा सुमारे चार वर्षांचा कार्यकाळ झाला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने लढल्या आहेत.
त्यांच्या कार्यशैलीने पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. यापूर्वी अनेकदा तक्रारीसुद्धा झाल्या आहेत. मात्र पक्ष श्रेष्ठींना आजवर याची कधीच दखल घेतली नव्हती. नेहमीच तक्रारींकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता मोठा पराभव झाल्याने त्यांना हटवण्यात येणार असल्याचे जवळपास ठरले आहे.
हे बघूनच पटोलेंनी आधीच राजीनामा देऊन स्वतःला बचावात्मक पवित्रा घेतला आहे. आता त्यांना विधिमंडळाचा नेता व्हायचे आहे. या संदर्भात पटोले म्हणाले, प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवायचेही की नाही याचा निर्णय हायकमांड घेत असते. 17 डिसेंबरला काँग्रेसचे प्रभारी नागपूरमध्ये (Nagpur) येत आहेत. त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचा गटनेता कोणाला करायचे याचा निर्णय होईल.
हा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही आणि विजय वडेट्टीवार यांनाही नाही. राजकारणात जय पराजय होत असतो. मात्र हायकमांड यासंदर्भात गांभीर्याने चर्चा करत आहेत. म्हणूनच प्रभारी येत आहेत. राज्यात कुठलीच लाट नसताना नसताना आम्ही 16 पर्यंत खाली आलो आहोत. हे आश्चर्यकारक आहे.. यामागे ईव्हीएमचं कारण आहे की दुसरे हे कालांतराने पुढे येईल. आमची मागणी बॅलेट पेपर निवडणूक घेण्याची असल्याचंही नाना पटोलेंनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.