
Mumbai News, 14 Dec : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवशी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसानिमित्त दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं असतानाच त्याच दिवशी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे काकांच्या पुतण्यासह भाजपसोबत हातमिळवणीबाबतच्या वाटाघाटी सुरु असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच या नेत्यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीत प्रचंड अस्वस्थता आहे.
एकीकडे विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यामुळे आघाडीतील काही नेते सत्तेसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच शरद पवारांबाबतच्या (Sharad Pawar) चर्चांमुळे आता भाजप खरंच राज्यात 'ऑपरेशन लोटस' राबवणार असल्याचं बोललं जात आहे. याच सर्व चर्चांवर आणि दिल्लीतील घडामोडींवर काँग्रेस नेत्यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे.
दिल्लीतील बैठकांचा जोर वाढला आहे, ते पाहता 'कुछ तो गडबड है' असं म्हणायला स्कोप असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता आघाडीच्या नेत्यांनी देखील शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेच्या शिवसेनेत प्रचंड मतभेद होते. ते निवडणुकीतीन पराभवानंतर आणखी वाढले आहेत. राज्याच्या विशेष अधिवेशनात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील मतभेद स्पष्ट दिसून आले. अशातच शरद पवारांच्या भूमीकेबाबत सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांवरून आघाडीतील नेत्यांमधील अस्वस्थता वाढली आहे.
मात्र, पवार वेगळी भूमिका घेणार नाहीत असा विश्वास आघाडीतील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. "भाजपला दुसऱ्याचे घर आणि पक्ष फोडण्यात आसुरी आनंद मिळतो, त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. यासाठीच ते काही तरी गडबड करण्याच्या प्रयत्नात असू शकतात. मात्र, पुरोगामी विचारांच्या आधारे शरद पवारांनी आपले पूर्ण आयुष्य घालवले आहे.
ते पाहता आताच्या या सर्व परिस्थितीत ते वेगळ्या दिशेने जाण्याचा अजिबात विचार करणार नाहीत, अशी मला खात्री आहे", असं वक्तव्य विजय वडेट्टवार यांनी केलं आहे. तर शरद पवार भाजपसोबत जाणार नाही, असा विश्वास ठाकरेंच्या खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, "काहीही झालं तरी शरद पवार आपली भूमिका बदलणार नाहीत आणि ते भाजपसोबत जाणार नाहीत, असं वक्तव्य आघाडीतील नेत्यांकडून केलं जात आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू असलेला पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, धर्मांध शक्तींपासून दूर राहण्याचा विचार शरद पवार यांनी राज्यात रूजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याचा विचार करणार नाहीत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.