
Mumbai News, 14 Dec : दादर येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील हनुमान मंदिरांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेना (Shivsena UBT) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हे मंदिर तोडू देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तर ठाकरे आता हिंदूंची मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.
भाजप नेत्यांच्या याच टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "भाजपच्या डोक्यात सडके कांदे, बटाटे आहेत. ते आता हिंदुत्वाचे बाप बनले आहेत का? हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला?
या भाजपवाल्यांना हिंदुत्व शिकवलं कोणी असा सवाल उपस्थित करत भाजपच्या (BJP) लोकांना त्याचं बोट धरून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं, मात्र, त्या वाटेवरही त्यांनी खड्डे केले आहेत, असा घणाघात राऊतांनी केला. "हे लोक काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार, आमचं हिंदुत्व हे भाजपसारखं मतांचं नाही.
हिंदुत्व हे आमच्यासाठी जीवन आहे, संस्कृती आहे. तुमच्यासारखं हिंदुत्वासाठी फावडे घेऊन आम्हाला फिरावं लागत नाही. हिम्मत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, असं आव्हान राऊतांनी यावेळी भाजपला दिलं. तर, दादर रेल्वे स्थानकातील जे मंदिर आहे. ते 80 वर्षापूर्वी एका हमालाने बांधलं आहे. त्यावेळी कोणत्या अडचणी आल्या नाहीत.
तिथलं हनुमान मंदिर हे मजुरांचं आहे. तो मजुरांचा देव आहे. त्यामुळे आज संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान तिथे महाआरती आम्ही करणार आहोत. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याचं राऊतांनी सांगितलं. तसंच, भाजपच्या नेत्यांना हिंदू म्हणून या आरतीसाठी यायची इच्छा असेल तर त्यांनी यावं. आम्ही त्यांच्या हातात गदा आणि घंटा देऊ.
त्यांनी हे मंदिर तोडून दाखवावं आम्हाला पाहायचे आहे भाजप खरंच हिंदुत्ववादी आहे का? मंदिरावर बुलडोजर चढवत आहेत. मात्र, बांगलादेशच्या प्रकरणावर भाजप शेपूट घालून बसला आहे. बांगलादेशातील हिंदूच्या अत्याचाराबाबतचा आवाज आम्ही संसदेत उठवण्याचा प्रयत्न केला. पण भाजपचं सरकार या विषयावर एक शब्द बोलायला तयार नाहीत, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली.
तर पूर्ण बहुमत मिळाल्यावरही हे सरकार मंत्रिमंडळ विस्तार करू शकत नाही. राज्याला एक महिन्यानंतरही सरकार देऊ शकत नाहीत .राज्यांमध्ये रोज खून दरोडे बलात्कार लुटमार सुरू आहेत आणि मुख्यमंत्री स्वत:ची मिरवणूक काढत आहेत. दुसरीकडे दररोज रस्त्यावर खून होत आहेत. राज्याला आरोग्य मंत्री नाही ,गृहमंत्री नाही शिक्षण मंत्री नाही परिवहन मंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत, हे कसलं राज्य आहे, याला राज्य म्हणतात का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.