
Nagpur, 22 May : धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोट्यवधींच्या रकमेने सध्या खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्यातील शासकीय कामांची पाहणी करण्यासाठी आमदारांची टीम आली होती, त्यामुळे ही रक्कम कोणासाठी गोळा करून आणण्यात आली होती, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे ही रक्कम ज्या रूममध्ये ठेवण्यात आली होती, ती एका आमदाराच्या सचिवाच्या नावाने बुक करण्यात आली होती. त्यामुळे आमदारावरचा संशय आणखीच बळावला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडले. ही रक्कम अधिकाऱ्यांनी गोळा केल्याचा दावा त्यांनी केला असून संपूर्ण जिल्ह्याची साफसफाई करण्याची मागणी केली.
माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी या रकमेचे बिंग फोडले आहे. त्यांनी संबंधित रूमसमोरच ठिय्या मांडून पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. खोलीची झाडाझडती घेतली असता सुमारे दीड कोटी रुपये आढळल्याचे समजते. मात्र, त्यामुळे आमदारांच्या दौऱ्यावर प्रश्न निर्माण झाले आहे.
आमदारांना मॅनेज करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आधीच रकमेची तजवीज करून ठेवली असल्याची चर्चा आहे, त्यामुळे विरोधकांना महायुती सरकावर आरोप करण्याची संधी चालून आली. असे असले तरी एरवी महायुती सरकारवर तुटून पडणारे आणि बेछूट आरोप करणारे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आमदारांची बाजू घेतली असल्याचे दिसून येते. त्यांनी याचे सर्व खापर अधिकाऱ्यांवर फोडले.
राज्यात भ्रष्टाचाराला प्रचंड ऊत आला आहे. राज्यातील आमदारांवर असे आरोप होत असतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून अपमानजनक आणि सहन न करणारा हा प्रकार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि सभापती यांना अशा दौऱ्यावर पारदर्कशकता राहील, याची काळजी घ्या अशी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समितीकडे बोट दाखविले जाते, तेव्हा लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचे सांगतात. दुसरीकडे शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींची रक्कम सापडते, याला काय म्हणावे, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.
बोगस बियाण्यांचे रॅकेट राज्यभर पसरले आहे. यात अधिकारीसुद्धा गुंतले आहेत. त्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे, त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात बोगस बियाण्यांचा विषय ऐरणीवर येतो. मोसम संपताच सर्वांना विसर पडतो. मात्र, याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. अधिकारी नामनिराळे राहतात. महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही कर्जमाफी झालेली नाही. आता बोगस बियाण्यांचे प्रकरण समोर आले आहे. हा प्रकार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. बोगस बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्यांना 10 वर्षांच्या शिक्षा दिली जावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.