
Nagpur News : सुमारे पंचवीस वर्षे काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेली विकासकामे विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर यांनी थांबविली आहेत. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. ठाकूर विरुद्ध देशमुख यांच्यात आता जुंपणार असल्याचे दिसून येते.
काटोल मतदारसंघाचे भाजपचे आमदार चरणसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना पत्र लिहून मंजूर केलेली कामे रद्द करण्यास सांगितले आहे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सुमारे 20 कोटींची कामे अनिल देशमुख आमदार असताना मंजूर करण्यात आली होती. या निधीच्या वितरणाचे आदेशही काढण्यात आले होते.
आता विद्यमान आमदारांनी कामे रद्द करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नेमके काय करावे, यावर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. हे पत्र उघड होताच देशमुखांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर त्यांनी जिल्हा परिषदेला आमची कामे थांबवल्यास याद राखा, असा इशारा दिला. अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघाचे सुमारे पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व केली. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ते राज्याचे गृहमंत्री होते. यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता.
तत्कालीन पोलिस आयुक्तांनी केलेल्या आरोपामुळे देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीस आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकारही कोसळले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यात मोठा पंगा झाला होता. अनेक धक्कादायक आरोप आणि प्रत्यारोप दोघांच्यावतीने एकमेकांवर केले जात होते.
विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी अनिल देशमुख यांनाच लढण्यासाठी सांगितले होते. त्यांच्याच नावाने एबी फॉर्म दिला होता. मात्र सलील देशमुख यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने अनिल देशमुख यांनी माघार घेतली होती. भाजपचे ठाकूर विरुद्ध राष्ट्रवादीचे सलील देशमुख असा सामना येथे रंगला होता. या सामन्यात ठाकूर यांनी बाजी मारली. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर काटोलमध्ये भाजपचा आमदार निवडून आला आहे. हे बघता येथे पाच वर्षे देशमुख विरुद्ध ठाकरे अशी पंगे होणार असल्याचे दिसून येते.
आंदोलनानंतर सलील देशमुख म्हणाले, भाजप नेत्यांकडून जाणीवपूर्वक कामे थांबवली जात आहे. असा दुजाभाव यापूर्वी बघितला नव्हता. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांनीसुद्धा आमची कामे रोखण्यापूर्वी चारवेळा विचार करावा, असा इशारा यावेळी सलील देशमुखांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.