
Maharashtra assembly election dispute : भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत 'मॅच फिक्सिंग' केल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांना भाजपच्या नेत्यांनी खोटारडे ठरवले.
निवडणूक आयोगाने बोलावलेल्या सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या बैठकीत काँग्रेसचे नेते झोपले होते का? बोगस मतदार केले होते, तर तेव्हाच का आक्षेप घेतला नाही, असाही सवाल त्यांना भाजपने केला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राची विधानसभा भाजपने चोरली, असा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. मतदार याद्यांमधील घोळाकडे लक्ष वेधताना त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख केला होता. यावर बावनकुळे यांनी त्यांना कामठीत येऊन अभ्यास करा, म्हणजे काँग्रेस का पराभूत झाली, असे प्रत्त्युतर दिले होते.
हा वाद सुरू असताना काँग्रेस कामठी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश भोयर यांनी मतदार यादीत 15 दिवसांत 12 हजार नावे ऑनलाईन समाविष्ट करण्यात आली, सोबतच मध्यप्रदेश व छत्तीसगड मधील मजुरांना मतदार केल्याचा आरोप भाजपवर (BJP) केला होता. एकप्रकारे त्यांनी बावनकुळे बेईमानी करून निवडून आल्याचे सांगितले होते. यावर आज भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, मनोहर कुंभारे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप खोडून काढले.
भोयर यांनी केलेल्या प्रत्येक आरोपांचे तारीख व आकेडवारी देऊन खंडन केले. निवडणूक आयोगानेच विधानसभेचे नामनिर्देशन स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवसाच्यापूर्वी 10 दिवस आधीपर्यंत आलेले मतदान नोंदणीचे सर्व अर्ज निकाली काढण्यात येणार असल्याचे आधीच कळविले होते. या दरम्यान आयोगाने 12 हजार 950 मतदारांची नावे समाविष्ट केली होती.
लोकसभा आणि विधानसभेच्या कालावधीत सात महिन्यांचे अंतर होते. त्यामुळे चार महिन्यात 35 हजार मतांची नोंदणी केल्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट होते. लोकसभेच्या निवडणुकीत कामठीमध्ये एकूण मतदार 4 लाख 66 हजार 231 एवढे होते. या दरम्यान राबवण्यात आलेल्या मतदार नोंदणीत 35 हजार 539 मतदार वाढले. याची टक्केवारी फक्त 7.08 इतकी आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यापूर्वी केंद्रीय स्तरावर सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाते. रहिवास आधारावरच नोंदणी केली जाते. त्यावेळी सुध्दा भोयर आणि काँग्रेसने आक्षेप घेतला नव्हता.
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर आणि मतदानाच्या तीन दिवस आधीपर्यंत मतदारांची नोंद करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगानेच जाहीर केले होते. मात्र हे सर्व अर्ज निवडणूक संपेपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आले होते. त्यामुळे तीन दिवस अगोदर 12 हजार मतदार वाढवले हे सुद्धा चुकीचे आरोप असल्याचे आनंदराव राऊत यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक व मतदार यादीबाबतच्या शंकेचे निरसन करण्यासाठी कामठीच्या बैठकीत काँग्रेसचे 22 प्रतिनिधी उपस्थित होते. यात माजी जिल्हा परिषद सदस्यांचाही समावेश होता. त्यावेळीसुद्धा कोणी मतदार यादी व वाढीव मतदारांच्या संख्येवर आक्षेप घेतला नसल्याचा दावा भाजपने केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.