
BJP Vs Congress : नागपूर जिल्ह्यात काँग्रेसने मागच्या 5 वर्षात भाजपला बरेच धक्के दिले. यात जिल्हा परिषद निवडणूक, विधान परिषदेची पदवीधर, शिक्षक निवडणूक, लोकसभेची निवडणूक सांगता येईल. पण याची सुरुवात झाली होती ती जिल्हा परिषद निवडणुकीपासून. जानेवारी 2020 मध्ये काँग्रेसने जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन केली. तत्कालीन मंत्री सुनील केदार या निवडणुकीचे किंग आणि किंगमेकर ठरले होते. पण मागच्या पाच वर्षात राज्यात आणि नागपूरमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे.
वर्षानुवर्षांची आमदारकी यंदा सुनील केदार यांच्या घरातून असलेली वजा झाली आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असून नागपूरचेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. सत्तेच्या प्रवाहात राहण्यासाठी केदार यांचे अनेक निकटवर्तीय भाजपच्या गळाला लागले आहेत. जिल्ह्यात मागच्या पाच वर्षात जवळपास 8 नगरपंचायती आणि एका नगरपालिकेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे केदार यांच्यापुढे जिल्हा परिषदेतील वर्चस्व राखण्याचे तर भाजपपुढे पुन्हा सत्ता खेचून आणण्याचे आव्हान आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत कधी काँग्रेसची तर कधी भाजपची सत्ता राहिली आहे. पण गेल्या पंचवार्षिकला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. सुनील केदार मंत्रीपदी होते. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. केदार यांच्या नेतृत्वात 58 पैकी 30 जागा जिंकत काँग्रेसने भाजपच्या हातून सत्ता खेचून आणली. तेव्हापासून काँग्रेसला सुरुंग लावून सत्ता खेचून घेण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले. मात्र, ऑपरेशन लोटस पुढे गेले नाही.
2021 मध्ये ओबीसी आरक्षणामुळे 16 जिल्हा परिषद सदस्य अपात्र ठरले होते. त्यासाठी ऑक्टोंबर 2021 मध्ये पोटनिवडणूक झाली. त्यातही भाजपला फारसे काही हाती लागले नाही. पोटनिवडणुकीत 16 जागांपैकी काँग्रेसने 9 जागा जिंकल्या होत्या. भाजपला केवळ 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या होत्या. 9 सदस्य निवडून आल्याने काँग्रेसचे 32 सदस्य झाले. 2022 मध्ये राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर पुन्हा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरु झाली.
मात्र, सुनील केदार यांनी जिल्हा परिषदेवरील पकड घट्ट बनवली होती. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही बंडोबा थंडोबा झाले. त्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाली. संधी शोधत असली तरी ती मिळाली नाही. आता येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत काँग्रेसला रोखण्याची रणनीती भाजपने आतापासून सुरू केली आहे. शिक्षेमुळे सुनील केदार निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडले आहेत. तर विधानसभेला त्यांच्या पत्नीचाही पराभव झाला आहे.
त्याचवेळी राज्यात भाजपने बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. याचा फायदा घेत केदार यांचे आणखी खच्चीकरण त्यासाठी आर्थिक बाहुबली असलेल्या नेत्यांना भाजपमध्ये खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला काही प्रमाणात यशही आले आहे. सुनील केदार यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आधीच भाजपच्या गळाला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वला बोढारे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दुधराम सव्वालाखे भाजपवासी झाले आहेत.
याशिवाय जिल्ह्यात गत 5 वर्षांत 8 नव्या नगर पंचायती आणि एका नगरपालिकेची निर्मिती झाली आहे. अद्यापही सावनेर तालुक्यातीस चनकापूर, चिचोली नगर परिषदेचा प्रस्ताव आहे. याचा परिणाम थेट जिल्हा परिषदेवर होणार आहे. आता जिल्हा परिषद सर्कल कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजघडीला जिल्ह्यात 13 तालुके असून आता 758 ग्रामपंचायती आहेत. तर जवळपास 32 नगर परिषद व नगर पंचायतीमध्ये निवडणुका होतील असा अंदाज आहे.
यात आता केदार यांच्यापुढे पुन्हा वलय तयार करण्याचे आणि वर्चस्व सिद्ध करण्याचे आव्हान आहे. तर राज्यात भाजपची सत्ता असल्याने, नागपूरचे फडणवीसच मुख्यमंत्री असल्याने, चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री असल्याने भाजपपुढे पुन्हा सत्ता खेचून आणण्याचे आव्हान आहे. जिल्हा परिषद जिंकायचीच असा चंगच भाजप नेत्यांनी बांधला आहे. त्यामुळे यंदा भाजप विरुद्ध काँग्रेस अशी तगडी लढत बघायला मिळणार हे नक्की आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.