
Nagpur News, 19 Aug : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासन आणि निवडणूक आयोगाची तयारी बघता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या सर्कल रचनेची सर्व प्रक्रिया आटोपली आहे. यावरील 4 आक्षेप दूर करून आराखडा सादर केला आहे. सर्कल निश्चित झाले असल्याने इच्छुकांची आडाखे बांधणी व चाचपणी सुरू झाली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक कार्यकर्ते आणि नेते आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. निवडणुका जाहीर झाल्या की लगेच प्रचार असा त्यांचा मनसुबा आहे. दीर्घ काळापासून या निवडणुका रखडलेल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील तयारी प्रशासनाने सुरू केली. जिल्हा परिषदेची सर्कल रचना तयार करण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींना नगरपरिषद, नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आला.
त्यामुळे जिल्हा परिषदेचे क्षेत्र कमी झाल्याने एक जागा कमी झाली. त्यानुसार 57 जागांसाठी सर्कल तयार करण्यात आले. या सर्कल रचनेवर 52 आक्षेप आले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे यावर सुनावणी झाली. यावेळी जिल्हा परिषद निवडणूक अधिकारी व सर्व तहसीलदार उपस्थित होते.
विभागीय आयुक्तांनी सर्व आक्षेप ऐकून घेतले. त्यातील भिवापूर तालुक्यातील 3 व एक कामठी तालुक्यातील असे 4 आक्षेप मान्य झाले होते. विशेष म्हणजे यंदा भगवानपूर नव्याने सर्कल तयार करण्यात आले आहे. नेमके त्यावरच 3 आक्षेप होते. भगवानपूर सर्कलमध्ये येणाऱ्या मालेवाडा गावाची लोकसंख्या अधिक असल्याने त्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय कामठी तालुक्यातील केम ग्रामपंचायत गुमथळा सर्कलमधून वडोदा सर्कलमध्ये टाकण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा ते वडोदा सर्कलमध्ये होते. परंतु, प्रशासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सर्कल रचनेत त्या गावांचा समावेश गुमथळामध्ये केला होता. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्या गावाचा समावेश आता वडोदामध्ये केल्याचे सांगितले जात आहे.
सर्कलनिहाय आराखडा, नकाशा निश्चित करून 22 ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आरक्षण निश्चित करण्यात येईल. त्यावर सूचना व आक्षेप मागविल्यावर ते अंतिम करण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीची अधिसूचना काढण्यात येईल.
याला महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी जिल्हा प्रशासनाने आक्षेपांवर दुरुस्ती करून आपला अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.