

Parth Pawar will be Minister : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होण्याची चर्चा आता सुरु झाली आहे. कारण त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळायला हवं असं शिफारस करणारं पत्र राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना लिहिलं आहे. तसंच त्यांना मंत्रीपद मिळणं का गरजेचं आहे? याची काही कारणंही त्यांनी या पत्रातून दिली आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस सध्या राज्यात महायुतीत आणि केंद्रात एनडीएमध्ये असल्यानं येत्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला एखाद्या मंत्रीपदाची मागणी पुढे येऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उदयकुमार अहिर यांनी यासंदर्भात पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना उद्देशून हे पत्र लिहिलं आहे. पार्थ पवार हे हुशार आहेत, तरुण आहेत. तसंच ते उच्चशिक्षित असून त्यांचं इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे, त्यामुळं त्यांची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागावी अशी इच्छा त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे. याबाबतचा विचार पक्ष प्रमुखांनी करावा आणि त्यासाठीचा पाठपुरावा केंद्रीय नेतृत्वाशी करावा असं देखील या पत्रात अहिर यांनी म्हटलं आहे.
पार्थ पवार हे राज्यसभेवर खासदार आहेत. खासदार असले तरी पक्षाची केंद्रात घट्ट पकड राहावी यासाठी पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेणं गरजेचं आहे. पण हे पत्र जेव्हा सुनेत्रा पवारांना देण्यात आलं. या पत्रानंतरच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना कल्पना न देताच भेट घेतली असल्याचं समोर आलं आहे. या भेटीदरम्यान एक पत्र पक्षाकडं आलं असल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचंही कळतंय. म्हणजेच उदयकुमार अहिर यांनी सुनेत्रा पवारांना पार्थ पवारांना केंद्रात मंत्रीपद मिळावं अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर पक्षांतर्गत वाद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.