
Mumbai News : महाराष्ट्रात सध्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी हा विषय शिकवण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून प्रचंड वादंग निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरुन राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितरित्या येत्या 6 जुलैला मोर्चाचं आयोजन केलं आहे. यामुळे सरकारविरोधातलं वातावरण आणखी तापलं असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत नवा बॉम्ब टाकला आहे.
आगामी पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी महायुती विरुद्ध विरोधी बाकावरील महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या अधिवेशनातच हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरुन विरोधक सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याचदरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी (ता.28) सूचक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धूर्त म्हटलं आहे.
अंजली दमानिया ट्विटमध्ये म्हणतात, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खूपच धूर्त म्हणावं लागेल. प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि विरोधी पक्षाला खेळवतात.मागच्या अधिवेशनात झटका की हलाल आणि औरंगजेबाची कबर हे विषय होते.यावेळी हिंदी भाषेचा विषय पुढे करून विरोधी पक्षाला गुंतवून ठेवणार.म्हणजे कोणीच खरे प्रश्न विचारायला नको,असं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 30 जून ते 18 जुलै या काळात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रचंड बहुमतात सत्तेत परतलेल्या महायुती सरकारकडून जय्यत तयारी सुरु केली आहे. तसेच विरोधकांच्या गोटातही फारकाही हालचाली सुरु नसल्याचंच समोर येत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला विरोधक कसे अडचणीत आणणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यात सध्या अनेक वादाचे मुद्दे गाजत आहेत, या सगळ्या मुद्द्यांवरून अल्पमतात असलेल्या महाविकास आघाडीकडे सरकारला घेरण्याची मोठी संधी आहे.त्यातही पावसाळी अधिवेशनात प्रामुख्याने सध्या गाजत असलेल्या शाळांमध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची सक्ती या विषयावरून राज्य सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्यातील शाळांमध्ये तिसरा विषय म्हणून हिंदी भाषेला पुरक असे धोरण घेतले होते. या धोरणाला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच हाच मुद्दा उचलून धरत ठाकरे बंधूंनी एकत्रित येण्याच्या उद्देशानं पहिलं पाऊल टाकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या अधिवेशन काळात हिंदीसक्तीचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.याच मुद्द्यावरुन सरकार बॅकफूटला जाऊ शकते.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी अतिशय धाडसी विधान केले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीची फक्त आगामी महापालिका निवडणुकीतच नव्हे तर येणाऱ्या सर्व निवडणुकीत धुळधाण होईल. ग्रामपंचायत ते विधानसभा फक्त ठाकरेंचा भगवाच फडकेल, असा दावाही पाटील यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.