
Bacchu Kadu: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर गांभीर्यानं चर्चा झाली. याच चर्चेचा तपशील स्वतः बच्चू कडू यांनी पत्रकारांना दिला. तसंच मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी यात्रा काढणार असून यात राज ठाकरेंनी देखील सहभागी व्हावं असं निमंत्रण त्यांनी दिलं आहे.
राज ठाकरेंसोबत बैठकीत शेतकऱ्यांचा विषय हाच एक संवाद होता. यासंदर्भात कशा पद्धतीनं सामोरं गेलं पाहिजे, पुढं आंदोलन कधी आणि केव्हा करणं संयुक्तिक होईल, या सगळ्यावर एकत्रित चर्चा झाली. हे आंदोलन फक्त बच्चू कडूंच्या नावाभोवती न फिरता ते शेतकरी म्हणून समोर कसं जाईल? याबाबतही चर्चा झाली. शेतकरी अडचणीत सापडला आणि सरकार त्यांची टिंगलबाजी करत आहे, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.
देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की, जर दुष्काळ पडला तर आपण कर्जमाफीचा विचार करु तसंच दुष्काळ पडायची वाटच आता शेतकऱ्यांनी पाहावी हे चित्र जे उभं केलं जात आहे. ही शेतकऱ्यांसाठी दुर्देवी गोष्ट आहे. माझ्याकडं येणारे मेसेज जर पाहिले तर पिकांना योग्य भाव न मिळाल्यानं शेतकरी मरताहेत, हे फडणवीसांच्या लक्षात आलं पाहिजे. हा विषय महत्वाचा आहे म्हणून मी राज ठाकरेंना आमंत्रण दिलं आहे की, मराठवाड्यात आमची यात्रा निघणार आहे.
या यात्रेत राज ठाकरेंनी सहभागी व्हावं आणि शेतकरी म्हणू संबोधित करावं. आमचं स्वप्न आहे की, मुंबई अनेकदा बंद होताना आम्ही पाहिली आहे पण ती आता शेतकऱ्यासाठी बंद राहिली पाहिजे. किमान अर्धा तास तरी मुंबईनं शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहाव. कारण ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या राजधानीतूनच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा या आमच्या अपेक्षा राज ठाकरेंसोबत आहेत.
हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीधर्माचा नाही. अमचा अजेंडा निवडणुकीचा नाही तर मरणारा शेतकरी आम्हाला वाचवायचा आहे. रोज शेतकरी हा भुकेल्या वाघासमोर उभा असतो, कधी त्याचा जीव जाईल सांगता येत नाही. गेल्या ७०-८० वर्षापासून शेतकरी उपेक्षित आहे. त्याच्या चुलीवर राजकारणाच्या भाकरी शेकायच्या या मताचा मी नाही. निवडणूक आयोग म्हणतंय आता आम्ही व्हीव्हीपॅट देणार नाही, मग आता राहिलं काय? निवडणूक घेण्यापेक्षा भाजपच्या कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा. सगळ्यात मोठं आज सामान्यातल्या सामान्य मतदाराला जरी विचारलं तर ते म्हणतात की ईव्हीएम मशिन असेल तर तुम्ही कशाला लढता निवडणुका? अशा भावना महाराष्ट्रात तयार होत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि प्रहार एकत्र येणार का? हा विषय आज घेणं संयुक्तिक नाही, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरेंचा अभ्यास चांगला आहे. फक्त आता एकच खंत आहे की शेतकरी एकत्र येणं! हाच सर्वात मोठा कठीण विषय आहे. जरी शेतकरी एकत्र झाला तरी तो राजकारणात एकत्र राहत नाही. शरद जोशींसारखा नेताही शेतकऱ्यांनी पाडला. राजू शेट्टी, रघुनाथ पाटील हे सर्वच जण लढताहेत शेतकऱ्यांसाठी पण जे जे शेतकरी म्हणून लढले ते ते मागं राहिलेत. पण तरीही राजकारण बाजुला ठेवून हा लढा कायम राहावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. गणेशोत्सवानंतर मराठवाड्यात शेतकरी यात्रा निघेल. तत्पूर्वी येत्या ९ तारखेला रक्षाबंधन आहे. आम्ही वेदनेची राखी बांधणार आहोत, सरकारला. मोदी आणि फडणवीसांचे मुखवटे लावून वेदनेची राखी बांधून आम्ही आंदोलन करणार आहोत. रोज १० ते १५ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे, एखाद्या युद्धात एवढे मृत्यू होत नसतील आणि ते सरकारच्या धोरणामुळं होत असेल तर हा गंभीर विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.