

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनीच पक्षात सर्वकाही अलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. 6 खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याची चर्चा सुरू असतानाच आमदार भास्कर जाधवांच्या एका प्रश्नामुळे अंतर्गत वाद समोर आल्याची चर्चा आहे.
'मुंबई तक' या वृत्तवाहिनीला षण्मुखानंद सभागृहाबाहेर भास्कर जाधव हे मुलाखत देत होते. त्यावेळी मागून एका गाडीने हाॅर्न वाजवत बाजूला होण्याचा इशारा केला. त्यावेळी भास्कर जाधव यांनी गाडीकडे रागाने पाहिले. मुलाखत घेणाऱ्या महिला पत्रकाराने नार्वेकर आहेत, असे जाधव यांना सांगितले. त्यावेळी नार्वेकर कोण लागून गेला? असा संतप्त सवाल जाधव यांनी केला.
जाधव यांच्या या वक्तव्यामुळे खासदार फुटीनंतर देखील ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद आणि नार्वेकर यांच्यावर असलेला राग अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे पीए, पक्षाचे सचिव ते आमदार असा प्रवास केलेले अत्यंत विश्वासू आणि पडद्यामागचे शक्तिशाली रणनीतीकार मानले जातात.
मात्र, छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यापासून ते अगदी एकनाथ शिंदेंच्या बंडापर्यंत, प्रत्येक वेळी बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर मिलिंद नार्वेकर हे नाव नेहमीच राहिले आहे. याचे मुख्य कारण नार्वेकर हे बऱ्याचदा उद्धव ठाकरे आणि आमदारांच्या दरम्यान एक 'अभेद्य भिंत' बनून उभे राहायचे
ग्रामीण भागातून किंवा घाटावरून आलेल्या ज्येष्ठ आमदारांना आणि मंत्र्यांनाही पक्षाध्यक्षांना भेटण्यासाठी तासनतास नार्वेकरांच्या परवानगीची वाट पाहावी लागायची, ज्यामुळे जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा स्वाभिमान दुखावला जात असे. त्यातच, कोणतीही जनमानसाची मोठी पार्श्वभूमी नसतानाही पक्षाच्या अंतर्गत नियुक्त्या, मतदारसंघातील निर्णय आणि निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये नार्वेकरांचा शब्द अंतिम मानला जायचा.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातही निवडून आलेले नेते बाजूला राहून सत्ता आणि निर्णयप्रक्रियेची सूत्रे नार्वेकरांभोवतीच फिरत असल्याने आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. थोडक्यात सांगायचे तर, नार्वेकर हे ठाकरेंचे 'कान आणि डोळे' असले, तरी सर्वसामान्य आमदारांसाठी ते 'मातोश्री'चे गेटकीपर ठरल्यामुळेच त्यांच्याविरोधात नेहमी रोष पाहायला मिळतो. आता भास्कर जाधव यांचाही मिलिंद नार्वेकर यांच्यावर राग असल्याचे दिसून येते.
यावेळी भास्कर जाधव म्हणाले, 'आरोप केला जातो की उद्धवसाहेबांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसला सोबत घेऊन सरकार बनवले. त्या आधी एक गोष्ट लपवली जाते की देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोबत घेऊन सरकार बनवलं होतं.त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आधी हातमिळवणी केली नाही. भाजप सारखे खोटारेडे लोक, पक्ष या जगात दुसरे नाही. '
'अजितदादा पवार तुमच्यासोबत आले आणि अर्थमंत्री झाले. अजितदादा निधी देत नाहीत म्हणून ते बोलत होते. आता अजितदादा नसले तरी त्यांच्यासोबत त्यांचा पक्ष सरकारमध्ये आहे. त्यांनी तुमचं हिंदुत्व स्वीकारलं काय?', असा सवाल देखील भास्कर जाधव यांनी केला.
'सातत्याने खोटं बोलून दाखवण्याचं काम केलं जातं. त्या वेळी सांगत होते आमच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावून निवडून आला, अरे २०१४ नाही लावला फोटो, २०१९ ला लावला. पण 1988 पासून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून निवडून येत होता. कालच्या निवडून उद्धवसाहेबांचा फोटो होता.नरेंद्र मोदींचा फोटो नव्हता. त्या उद्धवसाहेबांच्या फोटोचे आमदारा-खासदार तुम्हाला जनाची नाही मनाची लाज वाटत नाही का?', असा सवाल देखील जाधव यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.