
Loksabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याकडे राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागून आहे. येथील ठाणे आणि कल्याण या लोकसभा मतदारसंघापाठोपाठ आता भिवंडी या लोकसभा मतदारसंघ चर्चेला येताना दिसत आहे. प्रामुख्याने नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर दावेदारीचे वारे वाहण्यास सुरू झाले आहे.
तत्पूर्वी सुरेश ऊर्फ म्हात्रे बाळ्या मामा यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. त्यातच जिजाऊ या संघटनेमार्फत घराघरात पोहोचले. नीलेश सांबरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याने भिवंडी लोकसभा निवडणूक रंगतदार होईल, असेच दिसत आहे. तसेच भाजपचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांचा विजयरथ कोणी रोखेल की त्यांचा विजयरथ पुढे असाच दिल्लीत आगेकूच करेल का? हे पाहावे लागणार आहे. Bhiwandi Loksabha Election
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भिवंडी हा परिसर अल्पसंख्याक असल्याने तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून अजूनही ओळखला जातो. याच मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर पहिल्यांदा सुरेश टावरे हे निवडून आले. त्यानंतर सलग दोन वेळा हा मतदारसंघ काँग्रेस (Congress) पक्षाकडे राहिला. पण त्यांना हा मतदारसंघ राखता आलेला नाही. त्यातच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाकडून इच्छुकांनी तयारी सुरू केली.
मात्र शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विशेष अधिवेशनात शिवसेना शिंदे गटाचे सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करीत या मतदारसंघावर पहिला दावा केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसची एक बैठक पार पडली, त्यामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेकडून (उबाठा) इच्छुक असलेली मंडळी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त करीत आहेत. याशिवाय या मतदारसंघातून निवडून लढविण्यासाठी आता नीलेश सांबरे यांचे नाव पुढे येत आहे. त्यांनी याबाबत निर्धार केला आहे.
बाळ्या मामा हे सातत्याने खासदार पाटील यांच्याविरोधात दंड थोपटत आहेत. त्यातच आता त्यांना शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ लाभली आहे. मात्र त्यांना अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यातच जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमातून केलेल्या कामाने घराघरात सांबरे हे पोहोचले आहेत. पण, ते मूळ पालघर जिल्ह्याचे रहिवासी असून तेथील जिल्हा परिषद सदस्य आहेत. शिवाय ते कोणत्याही पक्षाशी जोडले गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मागे नेमका कोणता पक्ष आहे हेही पाहावे लागले.
याचदरम्यान जर काँग्रेस आणि शिवसेनेत (उबाठा) मध्ये बंडाळी झाली, तर खासदार कपिल पाटील यांचा विजयरथ कसा रोखला जाणार, हा प्रश्न आहे. तर, पाटील यांनी मतदारसंघात विविध विकासकामे केलेली आहेत. एकंदरीत या दावेदारीवरून ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता जास्त आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.