Mumbai News: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून गुरूवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. यानंतर सभागृहात वडेट्टीवारांचे अभिनंदन करण्यात येत असताना राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष नाही, असा टोमणा मारला. मात्र, यावर अजितदादांनी दिलेल्या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला.
"विरोधी पक्षनेत्याचे एवढे महत्व आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात नंतर येणाऱ्या आमदारांकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांच्या भाषणाकडे लक्ष द्यायला पाहिजे", अशी तक्रार जयंत पाटलांनी करताच यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आमचं लक्ष इकडेच असल्याचे सांगितले. पण पाटलांच्या या प्रश्नावर अजित पवारांनी पलटवार करत पाटलांनाच टोमणा मारला.
"विरोधी पक्षनेते वर बोलत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष नसल्याचे जयंत पाटील म्हणतायेत. पण आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष तुमच्याकडेच (जयंत पाटील यांच्याकडे) आहे, पण तुमचेच लक्ष आमच्याकडे नाही", असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. सध्या राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत तर दुसरा गट विरोधी बाकावर असल्याने दोन्ही गटात वार-पलटवार सुरू असतात. असाच प्रसंग आज विधानसभेत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पाहयला मिळाला.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.