
Mumbai News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच गेल्या काही वर्षांपासून बहचर्चित उद्धव-राज या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंबंधीच्या हालचालीही चांगल्याच वाढल्याचं दिसून येत आहे. अशातच आता महायुतीतील नेत्यानं केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आगामी मुंबई महापालिकेसाठी एकीकडे भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे विधानसभेला सपाटून मार खाल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेनं आता मुंबई महापालिकेसाठी युतीचे संकेत दिले आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलनाच्या चर्चा सुरू असतानाच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिवसेना-मनसे एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
दोन्ही बाजूच्या नेत्यांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य करत एकप्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या युतीबाबतचे काहीसे संकेतच दिले आहेत. राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर राजकीय नेतेमंडळींनीही उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वीही एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) अडचणीत आणणारी वक्तव्ये करणाऱ्या शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी आता पुन्हा एकदा नवा बॉम्ब टाकला आहे.
कीर्तीकर यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती असं म्हटलं आहे. त्यापुढे जात त्यांनी सध्याची एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजपप्रणित बनल्याची खोचक टीका केली आहे. महायुतीतीलच एका ज्येष्ठ नेत्यानं अशी भूमिका घेतल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
तसेच एकनाथ शिंदेंच्या बंडात त्यांच्यासोबत गेलेले माजी खासदार आणि बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेले कडवे शिवसैनिक गजानन कीर्तिकर यांनी आता नवा बॉम्ब टाकला आहे. त्यांनी शिंदेंनी आपल्या अनुभवाचा वापर करुन घेतला नसल्याची टीकेची तोफ डागली आहे. बाळासाहेबांसोबत काम केलेला शिवसैनिक असून अडीच वर्षे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत आहे, पण आपल्याला कामाची संधी मिळाली नसल्याची खदखद कीर्तिकर यांनी बोलून दाखवली आहे.
कीर्तिकर म्हणाले, आपण उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं. परंतू, आता मला एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊन अडीच वर्ष झाली आहेत. आपण भक्कम संघटनात्मक काम केलं. लोकाधिकार समितीच्या चळवळीत राहून काम केलं. 20 वर्ष आमदार, 10 वर्ष खासदार, 5 वर्ष मंत्री एवढा होतो, एवढा अनुभव असूनही शिंदे यांच्या शिवसेनेनं माझा कोणताही उपयोग करून घेतला नाही,याची अशी मनातली खंत त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एकत्र येऊन अखंड शिवसेना तयार करावी. कारण,सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप प्रणित आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस प्रणित आहे.यापुढे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं चालणारी शिवसेना आता हवी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
याचदरम्यान, त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जाणारी शिवसेना असं वाटत होतं, मात्र, सध्या तसं होताना दिसत नाही. बाळासाहेब ठाकरे यांना वाटायचं की, राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं. राज ठाकरे हे शिवसेनेतून निघून गेल्यानंतर मोठे शिवसेनेचे नुकसान झालं. शिंदे यांची शिवसेना ही भाजपप्रणित यासाठी आहे, कारण ते सध्या एनडीएमध्ये असल्याचंही म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.