

Mumbai local news : युवा आणि नव्या पिढीशी संवाद वाढवण्याचे प्रयत्न विविध jराजकीय पक्षांकडून सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. Gen Z आणि Gen Alpha या पिढीतील तरुणांच्या शिक्षण, रोजगार, प्रवास आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांवर राजकीय पक्षांकडून लक्ष केंद्रित केले जात आहे. भाजपने यात आघाडी घेतली आहे.
मुंबईच्या लोकलमधील वाढती गर्दी आणि त्याचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता, विद्यार्थ्यांसाठी लोकल ट्रेनमध्ये स्वतंत्र डबे राखीव ठेवावेत, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन डबे राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
तेजस्वी घोसाळकर यांच्या या मागणीमुळे मुंबई लोकलमधील प्रवासी व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. विशेषतः Gen Z आणि Gen Alpha या तरुण पिढीला भेडसावणाऱ्या दैनंदिन प्रवासाच्या अडचणींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या मागणीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने लोकल रेल्वेने प्रवास करतात. सकाळच्या वेळेत महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना लोकलमध्ये चढताना आणि प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
ही समस्या लक्षात घेऊन घोसाळकर यांनी १२ डब्यांच्या लोकल ट्रेनमधील तीन डबे केवळ विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवावेत, अशी मागणी केली आहे. हे डबे Gen Z आणि Gen Alpha या नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
घोसाळकर यांच्या पत्रानुसार, विद्यार्थ्यांसाठी राखीव डब्यांची सुविधा पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी. या कालावधीत विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांकडे प्रवास करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत विद्यार्थ्यांना स्वतंत्र डबे उपलब्ध झाल्यास त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होईल, असा या मागणीमागील उद्देश आहे.
मात्र, या मागणीची अंमलबजावणी करताना रेल्वे प्रशासनासमोर काही व्यावहारिक आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईतील १२ डब्यांच्या लोकलमध्ये विविध प्रवर्गांसाठी डबे राखीव असतात. यामध्ये महिलांसाठी दोन डबे, प्रथम श्रेणीसाठी एक डबा आणि सामान वाहतुकीसाठी एक डबा राखीव असतो. त्यामुळे उर्वरित डब्यांमध्ये सर्वसाधारण प्रवाशांची मोठी गर्दी होते.
विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी द्वितीय श्रेणीच्या डब्यांमध्ये अक्षरशः खच्चून गर्दी होते. अनेकदा गर्दीमुळे प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रवासाच्या सुविधांमधील फरकही कमी झाल्याचे चित्र दिसते.
विद्यार्थ्यांसाठी आणखी तीन डबे राखीव ठेवण्याच्या प्रस्तावामुळे सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या डब्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच गर्दीने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य प्रवाशांवरील ताण आणखी वाढू शकतो.
विशेषतः पीक अवर्समध्ये लोकलच्या प्रत्येक डब्यात मोठ्या संख्येने प्रवासी असतात. अशा परिस्थितीत तीन डबे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र केल्यास उर्वरित डब्यांमध्ये गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मागणीची अंमलबजावणी करताना प्रवाशांची संख्या, लोकलच्या फेऱ्या आणि गर्दीच्या वेळेतील वाहतूक यांचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक ठरणार आहे.
याच पार्श्वभूमीवर तेजस्वी घोसाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासाचा मुद्दा उपस्थित केल्याने त्यांच्या मागणीकडे राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासन या प्रस्तावाचा कसा विचार करतात आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डबे राखीव ठेवण्याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे मुंबईतील विद्यार्थी आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.