
Mumbai News : राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत असा आहे. यातूनच एकनाथ खडसे यांनी भाजप सोडला होता. परंतु आता खडसेंना पुन्हा भाजप प्रवेशाचे वेध लागले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सागर बंगल्यावर घेतलेली भेट आता चर्चेत आली आहे. या भेटीत खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची चर्चा आहे. परंतु खडसे यांनी ही भेट राजकीय नसून मतदारसंघातील कामांविषयी होती, असे म्हटलं आहे.
मुंबईतील सागर बंगल्यावर या दोघा दिग्गज नेत्यांची भेट झाली. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांमध्ये काहीवेळी चर्चा झाली. या दोघांच्या बैठकीवेळी मोजकेच आणि महत्त्वाचे नेते उपस्थित होते, असे सांगितले जात आहे. खडसे अन् फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्ष 2014 पासूनचा आहे. या राजकीय संघर्षाला आता दहा वर्ष होत आली आहे. तो कुठेतरी थांबावा, अशी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व आलं आहे.
राज्यात भाजप-शिवसेना (Shivsena) युतीची 2014 मध्ये सत्ता आली होती. राज्यात 2014 साली भाजपची सत्ता आल्यानंतर एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रिपदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, मोदी-शाह यांनी तुलनेने नवख्या असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले होते. या सत्तेच्या काही महिन्यांतच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या राजकीय संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष दिवसेंदिवस उफाळत जात टोक गाठले. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच कात्रीत पकडले. संधी सापडली की, आरोप करत राहिले. यातून संघर्ष वाढत जाऊन दोघांमध्ये वितुष्ट वाढले. देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला नाही. शांत बसून योग्य वेळीच वाट पाहत राहिले. यात राजकीय संघर्षात फडणवीस विजयी झाले.
एकनाथ खडसे यांच्यावर 2016 मध्ये एका जमीन व्यवहारात गैरव्यवहाराचे आरोप झाले. त्यामुळे एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले होते. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1980 च्या दशकापासून खडसे भाजपचे कार्यकर्ता म्हणून सक्रिय राजकारणात आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपला आपला पाया स्थापन करण्यात त्यांचे मोठं योगदान आहे. 1990 च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान खडसे यांनी कारसेवकांचे नेतृत्व केले. त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी झाशी येथे अटक केली आणि एक महिना तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळे खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करमत नसणार हे कालच्या भेटीवरून आणखी सिद्ध झालं.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला देशपातळीवर यश मिळत आहे. महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचे संकेत एकनाथ खडसे यांनी दिले. भाजप पक्षप्रवेशासाठी एकनाथ खडसे यांनी थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी संधान बांधले होते. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील भाजप पक्षसंघटनेवर असलेली प्रचंड पकड एकनाथ खडसे यांना पुनरागमनासाठी अडथळे ठरू लागली. यातून मार्ग काढण्यासाठी खडसे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीत पक्ष प्रवेशाचा देखील मुहूर्त ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक मुंबईतील सागर बंगल्यावर दाखल झाले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आमने-सामने चर्चा झाली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष संपण्याची चिन्हं असल्याची आता चर्चा रंगली आहे. मात्र एकनाथ खडसे यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या असून, मी मतदारसंघातील प्रलंबित कामांविषयी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले.
एकनाथ खडसे म्हणाले, "मतदारसंघातील सहकारी तत्त्वावरील सूतगिरणी त्याच्या भागभांडवलाचा विषय होता. मुक्ताई मंदिर, इंजिनिअरिंग कॉलेजचे विषय आहेत. याबाबत चर्चा करुन मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. बाकी राजकीय विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.