
BJP Politics News : राजकारण हे क्षेत्र अनिश्चिततेचं असल्याचं नेहमीच बोललं जातं. या क्षेत्रात कुणीच कायमचा शत्रू नसतो तसा कधीच मित्रही राहू शकत नाही. तसंच कधी कुणाच्या नशिबी सत्ता उपभोग येऊ शकतो तर कधी वनवास हे सांगता येणं शक्य नाही. कधी विरोधातल्या नेत्याला मोठी संधी मिळते. तर कधी सत्तेतल्या नेत्याला संधीसाठी झगडावं लागतं.
तसंच काहीसं पूर्वीश्रमीचे भाजपचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार एकनाथ खडसेंंच्या बाबतीत झालं. आता तेच कुठंतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवींच्या (Rajan Salvi) होतंय की काय अशी कुजबुज कोकणच्या राजकीय भूमीतून कानावर पडू लागली आहे.
शिवसेना ठाकरे गटामध्ये अनेक नेते नाराज विधानसभा निवडणुकीनंतर नाराज झाले आहेत. ज्यात कोकणातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते राजन साळवी यांचा देखील समावेश आहे. लांजा, राजापूर मतदारसंघासह रत्नागिरीवर पकड असणारे राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार करणार आहेत.
3 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा मुंबईमध्ये भाजप प्रवेश होणार होता. मात्र, त्यांच्या प्रवेशाला भाजप (BJP) नेते रविंद्र चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. यामुळे साळवी यांचा एकनाथ खडसे होणार की त्यांचा भाजप प्रवेश होणार असे अनेक प्रश्न आता राजकीय पटलावर उपस्थित होत आहेत.
विधानसभेतील पराभवानंतर नाराज झालेले राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला राम राम ठोकला. तसेच ते भाजप प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या. यानंतर आधी नाही पण नंतर त्यांनी स्वत: याबाबत कबुली देत भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्याचं सांगितले होते. तर याबाबत भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याचेही म्हटलं होतं.
पण भाजपचे माजी मंत्री आणि प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी त्यांच्या भाजप प्रवेशावर थेट वक्तव्य केले. चव्हाण यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाची कोणतीच चर्चा झालेली नाही. तशी भेट देखील झाली नसल्याचे म्हटलं होतं. यामुळे भाजप साळवींची राजकीय कोंडी करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या होत्या.
उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू पैकी एक अशी राजन साळवी यांची ओळख होती. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वकीयांना डावलून भाजपचे काम केले असा ठपका त्यांच्यावर शिवसेनेतील काही वरिष्ठांवर ठेवला. यामुळेच ते नाराज झाले असून शिवसेनेशी (Shivsena) त्यांनी फारकत घेतली आहे.
राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत वाढल्याचे बोलले जात होते. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. त्यांच्या निवासस्थानावर तीन ठिकाणी एसीबीने छापे घातले होते. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी रत्नागिरी कार्यालयात बोलावण्यात आले होते.
त्यांच्याकडे तब्बल 118.96 टक्के अपसंपदा जमा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, त्यांच्याविरोधात एसीबीने सुरू केलेल्या कारवाईमुळे देखील ते कंटाळले असून आता कारवाई थांबवण्यासाठीच ते भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात आहे.
राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या असतानाच आगामी भाजप प्रदेशाध्यक्षांनीच त्याला खो दिला आहे. यामुळे राजन साळवींचा पक्ष प्रवेश होणार की त्यांचा एकनाथ एडसे होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपला जय महाराष्ट्र करत एकनाथ खडसे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करताना भाजपला देखील निशान्यावर घेतलं होतं.
यानंतर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. ते अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. त्यावेळी काहीच दिवसात त्यांचा भाजप प्रवेश होईल असे संकेत मिळत असतानाच तो प्रवेश रखडला तो रखडलाच. एकनाथ खडसे आजही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सक्रीय आहेत.
आता राजन साळवी यांच्याबाबत असेच होताना दिसत असून विधानसभा निवडणुका होऊन चार महिने होत आहेत. पण राजन साळवी यांचा भाजप प्रवेश झालेल्या नाही. त्यांच्या प्रवेशाच्या अनेकदा चर्चा जोर धरतात. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध असल्याने तो झालेला नाही.
रत्नागिरीत सध्या ऑपरेशन टायगरमधून उद्धव ठाकरे गट फोडला जात आहे. येथे ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तर शेकडो पदाधिकारी प्रवेश करत आहेत. पण शिंदे गटाला राजन साळवी नको आहोत. तर भाजपला येथे उदय सामंत यांच्याविरोधात राजन साळवी यांच्या रूपाने एक चांगला मोहरा मिळणार असून तो येथे भाजप वाढवू शकेल.
यामुळे राजन साळवी यांच्या प्रवेशाच्या बातम्या सध्या वातावरण तापवत असून याकडे शिंदे गटाचे देखील बारीक लक्ष आहे. शिवसेनेकडून साळवी यांच्या प्रवेशाला अडथळा आणला जात असल्यानेच त्यांचा भाजप प्रवेश रखडल्याचे आता दबक्या आवाजात जिल्ह्यात बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. निवडणुकीवेळी त्यांनी त्यांनी थेट दिल्लीतील अमित शाह, जे.पी.नड्डा यांच्यासोबतचा फोटो टाकत घरवापसीचे संकेत दिले होते. तशी चर्चाही काही महिन्यांपासून सुरू झाली होती. नाथाभाऊंनीही त्याला दुजोरा दिला. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे, मात्र, त्याची अखेरपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
आपण भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून केंद्रातून प्रयत्न करण्यात आले. मात्र, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या भाजपप्रवेशाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्यानं आपण आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याची भूमिका विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंनी जाहीर करावी लागली. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. खडसेंसारखंच राजकारण महायुतीत आता साळवींच्या बाबतीत होतंय का अशी चर्चा जोर धरु लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.