

Dombivli Politics: कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील महायुतीच्या चर्चांना वेग आला आहे. तरी जागावाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत.
मंगळवारी झालेल्या बैठकीत पाच ते सहा प्रभागावर एकमत न झाल्याने युतीबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे हा विषय आता वरिष्ठ पातळीवर सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत आतापर्यंत शिवसेना आणि भाजपची संयुक्त सत्ता राहिली असून, शिवसेना हा पक्ष ‘मोठा भाऊ’ म्हणून ओळखला जात होता. मात्र राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर आणि शिवसेना दुभंगल्यानंतर स्थानिक पातळीवरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. याचदरम्यान बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपने नगराध्यक्षपद मिळवत आपली ताकद वाढवली आहे. यामुळे केडीएमसी निवडणुकीमध्येही भाजप अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर कल्याण–डोंबिवलीतील निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले आहेत. त्याचा थेट परिणाम युतीतील जागावाटपाच्या चर्चांवर होताना दिसत आहे.
शिवसेना (शिंदे गट) देखील आपल्या पारंपरिक प्रभावाच्या जागा सोडण्यास तयार नसल्याने दोन्ही पक्षांमधील ताणतणाव वाढला आहे. युती कायम राहणार की नाही, की जागावाटपात कोणता पक्ष वरचढ ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे लागले आहे. वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या चर्चेनंतरच कल्याण–डोंबिवलीतील महायुतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.