

Sub Classification: अनुसुचित जातींमधील उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आज मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चामध्ये हजारो दलित बांधव सहभागी झाले आहेत. मेट्रो सर्कल ते आझाद मैदान असा हा मोर्चा सुरु आहे. यासंदर्भात ९ आमदारांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विधानसभेत या विषयावर आम्हाला चर्चेसाठी वेळ हवा असल्याची विनंती केली होती. त्यानुसार, आज ही चर्चा सभागृहात पार पडली.
यावेळी अनुसुचित जाती प्रवर्गातील आमदारांनी उपवर्गीकरणाला कडाडून विरोध दर्शवला. तसंच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक होत. दलित समाजात दुही निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगत बिदर समितीचा अहवाल अद्याप का आलेला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, अनुसुचित जातींमध्ये मेरिटवर निवड होत असताना हा वाद कशाला घातला जात आहे? यासंदर्भात सखोल अभ्यासाठी सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल अद्यापही आलेला नाही, तरीही सरकार उपवर्गीकरणाचं विधेयक आणून या समाजात दुही निर्माण करण्याचं काम करत आहे. म्हणून याविरोधात ५ लाख लोक आज रस्त्यावर उतरले आहेत, आंदोलन करत आहेत" यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "हा निर्णय करत असताना सुप्रीम कोर्टानं जे निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल, कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही. अनुसुचित जाती समाजात जो कोणी मागे राहिला असेल त्याला पुढे आणण्यासाठी ज्या काही योग्य उपायोजना आहेत त्या केल्या जातील"
मी वडेट्टीवारांना लक्षात आणून देतो की, "सुप्रीम कोर्टाच्या याच आदेशानुसार, कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं उपवर्गीकरण केलं आणि तिथं त्याचा कायदाही झाला. तसंच तेलंगणातही काँग्रेसचं सरकारनं उपवर्गीकरण केलं आणि त्याचा कायदाही झाला. महाराष्ट्रात मात्र आम्हाला हे लादायचं नाही, आम्हाला सहमतीनं सर्वांना विश्वासात घेऊन कायद्याचं तंतोतंत पालन करुन, हे करायचं आहे. त्यामुळं कमिटी सर्वांचं म्हणणं ऐकून घेईल, विधीमंडळातील सदस्यांशी देखील चर्चा होईल. त्यानंतर यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल, त्यामुळं कोणीही गृहितकांच्या आधारे आणि अफवांच्या आधारे कुठलंही मत बनवणं योग्य होणार नाही" अशी स्पष्ट भूमिका यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
मुंबईत अनुसुचित जातींमध्ये होणाऱ्या संभाव्य उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी हजारो दलित बांधव हे मुंबईत दाखल झाले आहेत. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो सर्कल ते आझाद मैदान असा हा मोर्चा सुरु आहे. यावेळी सरकारनं केवळ एकाच जातीच्या मागणीनुसार उपवर्गीकरणाचा घाट घालू नये, कारण महाराष्ट्रातील अनुसुचित जातींच्या यादीतीत ५९ जातींचा समावेश होतो. यांपैकी ५८ जातींचा उपवर्गिकरणाला विरोध आहे.
यामध्ये केवळ एकच मातंग समाजातील काही राजकीय पुढाऱ्यांनीच केवळ उपवर्गिकरणाची मागणी लावून धरली आहे. याच समाजातील काही लोक याच्याविरोधातच आहेत. जर उपवर्गीकरण झालं तर त्यामुळं मातंग समाजाचंच मोठं नुकसान होईल, अशी त्यांची भावना आहे. कारण यामुळं सध्या जे १३ टक्के आरक्षण हे सर्व ५९ जातींना एकत्रितरित्या मिळतं आहे, त्यामुळं इथं मेरिटवर स्पर्धा करुन जास्तीत जास्त फायदा मातंग समाजाला मिळवता येऊ शकतो. पण जर उपवर्गीकरण झालं तर मातंग समाजाच्या वाट्याला लोकसंख्येनुसार, कमी वाटा येईल त्यामुळं कमी टक्के आरक्षणातच मातंग समाजाला मर्यादित लाभ मिळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.