
Marathi Vijay Melava: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधातील आंदोलन यशस्वी ठरल्यानं विजयाची सभा उद्या वरळीच्या 'एनएससीआय डोम' या सभागृहात पार पडणार आहे. ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे, कारण तब्बल वीस वर्षांनंतर दोघे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत. इतकंच नव्हे तर दोन्ही ठाकरेंची एकत्र भाषणंही होणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्यानं शिवसैनिक आणि मनसैनिक अशा दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून दुसरीकडं सामान्य मराठी माणसाचं देखील या सभेकडं लक्ष लागून राहिलं आहे.
मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र येणाऱ्या या दोन्ही भावांमुळं राज्यात काही नवी राजकीय समिकरणं तयार होतात का? याबाबत उद्याच्या सभेत काही घोषणा होतेय का? याकडंही सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. केवळ सर्वसामान्यांच्याच नव्हे तर सत्ताधारी पक्षांच्या देखील याकडं नजरा असतील. पण उद्याच्या सभेदरम्यान नेमकं काय घडू शकतं? याचा आढावा घेऊयात.
उद्याच्या सभेचं आयोजन हे ठाकरेंची शिवसेना आणि ठाकरेंची मनसे या दोन पक्षांकडून करण्यात आलं आहे. मनसेच्यावतीनं या विजयी मेळाव्याच्या निमंत्रणासाठी सोशल मीडियावरुन प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमध्ये निमंत्रक म्हणून राज ठाकरे-उद्धव ठाकरे असा उल्लेख करण्यात आला होता. पण महत्वाचं म्हणजे यामध्ये मराठी जनांना सभेला येण्यासाठी ज्या पद्धतीनं आवाहन करण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे की, हिंदीच्या मुद्द्यांवरुन तुम्ही सरकारला नमवलं आहे. मराठी जनांनी नमवलं आहे. आम्ही फक्त तुमच्यावतीनं संघर्ष करत होतो. त्यामुळं हा आनंद साजरा करतानासुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्हीच करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात या, गुलाल उधळत या!! आम्ही वाट पाहतोय...!
या आवाहनामध्ये ठाकरे बंधुंनी कुठेही मराठीच्या लढ्याचं श्रेय घेतलेलं दिसत नाही. त्यामुळं ज्या प्रकारे हिंदी सक्तीविरोधात सामाजिक क्षेत्रातील, मनोरंजन क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, पत्रकारिता क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील मराठी जाणत्या लोकांनी हिंदी सक्तीच्याविरोधात भूमिका घेतली आणि ती राज ठाकरे यांनी हिरीरीनं लावून धरली. इतकंच नव्हे तर उद्याच्या ५ जुलैला हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची हाक दिली. तसंच मराठी अभ्यास केंद्राच्यावतीनं मुंबई पत्रकार संघात सरकारनं काढलेले हिंदी सक्तीचे जीआर जाळण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन उपमुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन तातडीनं पत्रकार परिषद घेत सरकारनं काढलेले हिंदी सक्ती आणि शुद्धीपत्रक हे दोन्ही जीआर मागे घेत असल्याची घोषणा केली.
म्हणजेच मराठी भाषेचं एक सकारात्मक राजकारण इथं पाहायाला मिळालं. या नव्या प्रकारच्या राजकारणापुढं सरकारलाही झुकावं लागलं आणि त्यामुळेच मराठी भाषेच्या नव्या राजकारणाला सुरुवात झाल्याच आपण म्हणू शकतो. उद्याच्या मेळाव्यात या राजकारणाला दिशा देणाऱ्या काही घडामोडी घडल्या किंवा ठराव किंवा काही कार्यपद्धती तयार करण्यात आलीच, तर त्यामुळं उद्याची सभा ही महाराष्ट्रात दक्षिणेतील राज्यांप्रमाणं एका वेगळ्या भाषिक राजकारणाची नांदी ठरु शकेल.
मुळात शिवसेना हा पक्ष स्थापन झाला तोच मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाचा रोजगार, भूमिपुत्रांना पहिलं प्राधान्य या मुद्द्यांवरुन या संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांच्या राजकारणाची स्पेस व्यापक अशा हिंदुत्वाच्या राजकारणाकडं वळली. पण तरीही त्यांनी मराठी माणूस म्हणून राजकीय नेत्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर राज ठाकरे शिवेसनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना झाली. हा पक्ष देखील मराठी माणूस आणि हिंदुत्व असाच अजेंड्याचा विषय घेऊन पुढे जात राहिला. पण अलिकडच्या काळात हिंदू धर्मातील चुकीच्या प्रथांना विरोध करताना, पर्यावरणाचा मुद्दा महत्वाचा असल्याचं राज यांनी वारंवार आपल्या व्यासपीठावरुन ठणाकवून सांगितलं.
तर दुसरीकडं राज्याच्या राजकारणाला नवं वळणं मिळालं ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर. कारण उद्धव ठाकरे यांनी चक्क भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करत महाविकास आघाडी स्थापन केली आणि स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतरच शिवसेना फुटीचं राजकारण सर्वांनाच माहिती आहे. पण यानंतर अनेक राजकीय धक्के खाल्यानंतर उद्धव ठाकरे देखील मराठी माणसाचा मुद्दा केंद्रस्थानी आणू पाहत आहेत. त्यासाठी आता नुकत्याच हिंदीच्या मुद्द्यावरुन झालेली उलथापालथ त्यांच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळं केवळ आगामी मुंबई महापालिकेची निवडणूकच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागातील मराठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. खुद्द बाळा नांदगावर यांनी नुकतेच साम टीव्हीवरील मुलाखतीत हा मुद्दा मांडला. त्यामुळं भाजपनं देशपातळीवर हिंदुत्वाची कावड खाद्यावर घेतलेली असल्यानं राज्यात मराठीच्या मुद्द्यावर आता ठाकरेंची सेना आणि ठाकरेंची मनसे आपलं राजकारण बळकट करु शकतात. त्यादृष्टीनं जर उद्याच्या मेळाव्यात काही घडामोडी घडल्या तर यातूनच मराठी जनतेच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते.
सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ठाकरे बंधू उद्या एकत्र येणार ही शिवसेना आणि मनसेची युतीची पहिली पायरी ठरु शकते. कारण हिंदी सक्तीचा मुद्दा उपस्थित होण्यापूर्वीच राज ठाकरेंनी अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्याच्यापुढं आम्हा भावंडांमधील वाद किरकोळ आहेत, असं विधान केलं होतं. तसंच जनतेची इच्छा असेल तर एकत्र यायला आमची काहीही हरकत नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्याच दिवशी दुसऱ्या एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी घातलेल्या सादेला प्रतिसादही दिला. जनतेच्या मनात असेल तर एकत्र यायला हरकत नाही अशा आशयाचं विधान त्यांनी केलं होतं. तेव्हापासूनच खरंतर महाराष्ट्रात ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. केवळ चर्चाच नाही तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांनी या आशयाचे फ्लेक्स लावले. एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह यानिमित्त पाहायला मिळाला. याचाच पुढचा अंक त्यानंतर हिंदी सक्तीविरोधात दोन्ही भावांनी एकत्र रॅली काढण्यापर्यंत पोहोचला.
तीच रॅली आता उद्या विजयाची सभा म्हणून होणार आहे. पण प्रश्न हाच शिल्लक राहतो की, दोन्ही भाऊ हे कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आणि मराठी माणसांच्या इच्छेला अनुसरुन एकत्र येतात का? जर उद्याच्या मेळाव्यात शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन आगामी महापालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा होऊ शकते. सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेची निवडणूक आणि मराठी माणूस असं समीकरण जर या दोन्ही भावांनी जुळवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी एकत्र येत असल्याची घोषणा केली तर महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण जुळून येईल आणि नव्या राजकारणाला देखील सुरुवात होऊ शकते.
उद्याच्या मेळाव्याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं या व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित असतील. तसंच जर याच व्यासपीठावर शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा झाली तर महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्राला वेगळा पर्याय देण्यासाठी मनसेनं देखील आघाडीत यावं अशी ऑफर दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांचा विचार केला तर एकीकडं महायुतीतील तीन पक्षांना महाविकास आघाडीतील चार पक्षांनी प्रत्युत्तर देण्याचा पर्याय तयार होऊ शकतो.
त्यामुळं सध्या राजकीय खेळात पिछाडीवर असलेल्या मनसेच्या पुनरुज्जीवनासाठी जर राज ठाकरे यांनी आघाडीत येण्यास हिरवा कंदील दिला तर महाविकास आघाडीला चौथा भिडू मिळू शकतो. यामुळं सहाजिकच महाविकास आघाडी आणखी मजबूत होईल. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसाठी फायरब्रँड नेते या आघाडीला मिळतील. इतकंच नव्हे तर ठाकरे ब्रँड सोबत असल्यानं महाराष्ट्रातील जनतेसाठी नवा राजकीय पर्याय म्हणून महाविकास आघाडीकडं मराठी जनता अधिक आकर्षित झाली तर नवल वाटायला नको.
त्यामुळं अशा अनेक मुद्द्यांचा विचार केल्यास उद्याचा मराठी विजयाचा मेळावा हा ऐतिहासिक आणि तितकाच महत्वाचा असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.