

Mumbai BMC Election Controversy : विधानसभा अध्यक्ष तथा भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी महापालिका निवडणुकीत घरातील एक नव्हे, तीन उमेदवार लढत आहे. यातूनच त्यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव होता. त्यांच्या सांगण्यावरूनच निवडणूक अधिकाऱ्याने मुंबई महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले नाहीत, असा आरोप करणारी याचिका आठ जणांनी उच्च न्यायालयात मंगळवारी दाखल केली आहे.
मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मंगळवारी ही याचिका सुनावणीसाठी आली; परंतु न्यायालयाने (Court) त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आणि योग्य वेळी सुनावणी घेतली जाईल, असे स्पष्ट केले. याचिकाकर्ते बबन महाडिक यांच्यासह नीरज राठोड, वैशाली गावडे, मेहबूब हुसेन मद्दनवार, परिचय भोईर, मनोज मोरे, रबसाना अहमद शफिक शेख, मार्गरेट जी कोस्टा या आठ उमेदवारांनी ॲड. आशीष गायकवाड यांच्यामार्फत याचिका दाखल केली.
प्रभाग क्रमांक 224 ते 227 साठी आवश्यक कागदपत्रे आणि अनामत रकमेसह अर्ज सादर केल्यावरही आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणून ते अर्ज स्वीकारू दिले नाहीत, असा आरोप याचिकेत केला आहे. उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर आपण उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे याचिकेत नमूद केले आहे.
महापालिकेच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश देण्याची मागणी या आठ इच्छुक उमेदवारांनी केली आहे.
राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मधून अनुक्रमे वहिनी हर्षिता नार्वेकर, भाऊ मकरंद नार्वेकर आणि बहीण गौरी नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळेच नार्वेकर यांनी राजकीय सत्तेचा आणि विधानसभेच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला.
तसंच उमेदवारांना (याचिकाकर्त्यांना) निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून बाहेर काढण्यासाठी पोलिस यंत्रणेवर दबाव आणल्याचा आरोपही याचिकेत केला. नार्वेकर हे घटनात्मक पदावर असताना, विविध पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज भरताना ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित का होते, असा प्रश्नही याचिकेत उपस्थित केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात कोणतीही औपचारिक तक्रार नसल्याचे माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचे आम आदमी पक्षाने तीव्र शब्दांत खंडन केले आहे. अध्यक्ष नार्वेकर यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप करत आपने पालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे तिसरी अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती देण्यात आली. जनता दलाने (एस) आपली तक्रार मागे घेतली असेल; मात्र आम आदमी पक्षाने कोणतीही तक्रार मागे घेतलेली नाही, असा ठाम दावा ‘आप’कडून करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.