

Mumbai BMC elections : केंद्रापासून राज्यापर्यंत सत्ता असलेल्या बलाढ्या भाजप महायुतीसमोर टिकण्यासाठी, ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यातील इतर निवडणुकांकडे दुर्लक्ष करत ठाकरे बंधूंनी संपूर्ण लक्ष मुंबईवर केंद्रीत केली आहे. महानगरांची सत्ताशर्यत जिंकण्यासाठी आजपासून लढाईला सुरूवात झाली. अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस आहे.
राज ठाकरे यांच्या ‘मराठी कार्ड’ची ताकद आणि उद्धव ठाकरेंची संघटनात्मक बांधणी, याला यश येण्यासाठी बंडखोरी रोखण्याच्या रणनीतीवर भर आहे. ठाकरेंकडे सर्व 227 जागांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार आहे. परंतु ‘वेट अँड वॉच’चे धोरण ठेवून शेवटच्या क्षणी अर्ज भरण्याची रणनीती आखली आहे. जेणेकरून विरोधकांना फोडाफोडीसाठी वेळ मिळणार नाही.
मुंबई (Mumbai) महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे. विशेष करून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी भाजप महायुतीने मुंबईत चहू बाजूने घेरलं आहे. भाजपबरोबर यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे ठाकरेंसमोर तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत कोणताही गाफिलपणा नको म्हणून, उद्धव ठाकरे स्वतः लक्ष ठेवून आहेत.
निवडणुकीमुळे 'मातोश्री'वर प्रत्येक माहितीची खबरबात ठेवली जात आहे. गेल्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत प्रत्येक भागातील, प्रभागाचा आढावा घेतला आहे. एक हजारांपेक्षा अधिक इच्छुकांशी थेट संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि इच्छुकांशी स्वतः उद्धव ठाकरेंनी चर्चा केली.
स्थानिक गणिते लक्षात घेत, प्रत्येक प्रभागातील जातीय समीकरणे, विरोधकांची ताकद आणि स्थानिक जनमत याचा कानोसा घेतला. मुंबईतील 227 प्रभागांवर ठाकरेंनी स्वतः लक्ष केंद्रित केल्याने, विजयाची समीकरणे जुळून येतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यातच राज ठाकरेंची जोड मिळत असल्याने भाजप महायुतीसमोर तगडं आव्हान उभं राहू लागलं आहे.
ठाकरे बंधूंनी ही निवडणूक सोपी नाही. शिवसेना फुटीनंतर अन् सत्ताधारी भाजप महायुतीच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांनंतर ही राजकीय समीकरणे खूप बदलली आहेत. शिवसेनेकडून एक प्रभागात आठ ते दहा इच्छुक आहेत. प्रत्येक जण एकमेकांसमोर विजयासाठी तगडं आव्हान उभं करू शकतो, असे हे उमेदवार आहेत. यातून बंडखोरीची दाट शक्यता लक्षात घेऊन, ठाकरेंनी वेगळी रणनीती आखली आहे. प्रत्येक इच्छुकाशी वैयक्तिक संवाद साधून, कार्यकर्त्यांकडून समांतर आढावा घेत आहेत.
याशिवाय इच्छुकाला थेट ‘मातोश्री’वर बोलावून त्याचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. यात काही इच्छुकांमधील नाराजी दूर करण्यात ठाकरेंना यश आले आहे. 227 उमेदवारांची यादी तयार असूनही फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी ठाकरेंनी ही नावे उघड केलेली नाहीत. स्वतः पक्षप्रमुखांनी जातीने लक्ष घातल्याने कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, अंतर्गत कलह रोखण्यासाठी ही खेळी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या 227 जागांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार आहे; मात्र ही यादी सध्या जाहीर न करता, ‘वेट अँड वॉच’चे धोरण ठेवून शेवटच्या क्षणी अर्ज भरण्याची रणनीती आखली जाऊ शकते, जेणेकरून विरोधकांना फोडाफोडीसाठी वेळ मिळणार नाही.
मुंबईत ठाकरे बंधूंची संभाव्य युतीवर कधीही शिक्कामोर्तब होऊ शकतो. येत्या एक-दोन दिवसांत दोन्ही बंधू एकत्र येऊन युतीची अधिकृत घोषणा करतील. राज ठाकरे यांची ‘मराठी कार्ड’ची ताकद आणि उद्धव ठाकरेंची संघटनात्मक बांधणी एकत्र आल्यास महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
काँग्रेसने मुंबईत ठाकरेंची साथ सोडत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याने आता ठाकरे यांनी नवीन समीकरणे उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महायुतीचा सामना करण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंच्या मनसेला हाताशी धरले आहे. त्यामुळे मुंबईत सत्ताधारी भाजप महायुतीविरुद्ध ठाकरे बंधू, असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.