Rajesh More News : कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पलावा पूल शुक्रवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला झाला आणि बंद देखील झाला. कल्याण ग्रामीणचे एकनाथ शिंदेंचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी घाईघाईने उद्घाटन करत पूल सुरू करत विरोधकांवर टीका केली. मात्र पुलाचे काम शिल्लक असल्याने उद्घाटनाच्या दोन तासातच पुन्हा हा पूल बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
पुलाचे लोकार्पण करताच पुलावरून तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू देखील झाली. मात्र काही तासांतच ही वाहतूक बंद करण्यात आली. पुलाचे काम काही प्रमाणात शिल्लक असून सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासकीय यंत्रणेकडून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यावर माजी आमदार, मनसे नेते राजू पाटील यांनी ट्विट करत टीका केली.
संथगतीने काम सुरू असलेला देसाई खाडी ते काटई नाका हा पलावा पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. या पलावा पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. व याबाबत मी त्या पुलाच्या गुणवत्तेच्या तपासणीची मागणी ही केली आहे. परंतु आज स्वतःला 'इन्फ्रास्ट्रक्चर मॅन' म्हणवणारे कोणताही गाजावाजा न करता आपल्या समर्थकांकडून पुल सुरू करून मोकळे झाले खरे पण काही वेळातच हा पुल बंद करण्यात आला आहे. नक्की काय गोंधळ आहे असा सवाल करत पाटील यांनी केला. तसेच भैय्याजी हमार पुल ठिक है ना बा ? ये छू छे गांडाभाई ? असे म्हणत मतांसाठी सुरू असलेले राजकारणावर टीका केली आहे.
पुलाच्या उद्घाटनाची तारीख पे तारीख दिली जात होती. मात्र, शुक्रवारी (ता.4) सकाळी आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी कार्यकर्त्यांसह पुलाचे उदघाटन केले. यावेळी आमदार राजेश मोरे म्हणाले, कल्याणशीळ रोडवरील वाहतुक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून पलावापूलाची उभारणी करण्यात आली.
हा पूल आज पासून वाहनांसाठी सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे लोक खुश होतील अशी आम्हाला आशा आहे विरोधकांना आम्ही हेच सांगू इच्छितो की आम्ही ट्विटर द्वारे केवळ टीका करत नाही. ग्राऊंड लेव्हलला उतरून काम कसे चालले याची पाहणी करतो तसेच आम्ही काम करून दाखवतो. विरोधकांना देखील सांगतो की पूल सुरु झालेला आहे, असा टोलाही राजेश मोरे लगावला.
कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मे अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल असे सांगितले होते. मात्र पुलाचे त्यावेळी खूप काम शिल्लक असल्याने व अवकाळी आलेल्या पावसामुळे कामास विलंब झाल्याचे सांगत जून अखेरीस हा पूल खुला केला जाईल असे आमदार मोरे यांनी सांगितले. मात्र जुलै महिना उजाडला तरी पूल वाहतुकीसाठी खुला केलेला नाही, तसेच काम देखील पूर्ण न करताचा आमदार मोरे यांनी पूलाचे उद्घाटन केले आणि अवघ्या दोन तासांतच पुन्हा पूल बंद करण्यात आल्याने टीका करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.