
Aditya Thackeray: मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पण याला मुंबईतील जैन आणि गुजराती समाजानं विरोध दर्शवला आहे. कबुतरांना दाणापाणी देणं हे आमचं धार्मिक कर्तव्य असल्याचा त्यांचा दावा असून याच्या आड हा निर्णय येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडं स्थानिक मराठी लोकांनी या कबुतरांमुळं आम्हाला श्वसनाचे आजार होत असल्याचं सांगत कोर्टाच्या निकालाचं स्वागत केलं आहे.
पण आता यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. जैन समाजानं विरोध केल्यानं मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांनी दादर इथला कबुतरखाना हटवण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसंच कबुतरांना नियंत्रित दाणापाणी करायला पाहिजे असं म्हटलं आहे. यावरुन शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर राजकीय टिप्पणी केली आहे.
कबुतरखाना हटवा अशी मागणी विधानसपरिषदेत भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली होती. तर दुसरीकडं भाजपचेच आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा कबूतरखाना हटवू नये अशी मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, "कबुतरखान्याचा विषय कोर्टाचा आहे, स्थानिक रहिवाशांची याबाबत काय भावना आहे हे लक्षात घेऊन सरकार पुढे काय करणार आहे, याच्याकडं देखील लक्ष असणार आहे. शेवटी सरकार परत कोर्टात अपिलमध्ये जाणार आहे की फक्त चर्चाच करणार आहे. विशेष म्हणजे याबाबत मंगलप्रभात लोढा जे मंत्री आहेत ते बीएमसीला पत्र लिहितात याहून धक्कादायक गोष्ट मी पाहिलेली नाही. कारण ते पालकमंत्री आहेत ते आदेश देऊ शकतात तरी ते पत्र लिहितात. मुंबईतील धर्मशाळा असलेल्या जैन देरासर प्रकरणीही त्यांनी हेच केलं आहे. मी पालकमंत्री असताना जैन देरासर दोनदा वाचवलं होतं. पण या मंगलप्रभात लोढांनी पालकमंत्री झाल्यानंतर ते पाडू दिलं आणि त्यानंतर तिथं आंदोलनात सहभागी व्हायला गेले"
जर कबूतरखाना तिथं ठेवायचं असेल अशी स्थानिकांची भावना असेल तर आम्ही स्थानिकांसोबत आहोत. ते जे आरे कॉलनी वैगरे सांगत आहेत तिथं ते शक्य नाही. नाहीतर त्यापेक्षा लोढांनी वरळी सीफेसला चांगला बंगला बांधत आहेत तिथं त्यांनी ते करावं. तिथं त्यांनी कबुतरखान्यासाठी एक चांगला प्लॉट मिळवून द्यावा तिथेच चांगला कबुतरखाना होईल. याप्रकरणात मराठी, जैन, गुजराती लोकांच्या भावना तीव्र आहेत. यामध्ये त्यांचे अनुभव वेगवेगळे आहेत. कोणाला यामुळं श्वासाचा त्रास होतो, कोणी तिथं टाकलेल्या खाद्यावरुन घसरुन पडलेलं असतं. त्यांची भावना सर्वांना बसून त्यावर पुढे चर्चा होऊ शकते. पण पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहितात यापेक्षा हास्यास्पद गोष्ट मी पाहिलेली नाही. त्यापेक्षा त्यांनी यासाठी नवा प्लॉट द्यावा, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जोपर्यंत कोर्टात हे संपूर्ण प्रकरण मार्गी लागत नाही तोपर्यंत या कबुतरांना कन्ट्रोल फिडिंग करावं, असं मुख्यमंत्री म्हणतात. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, "ही कबुतरं म्हणजे काय एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत कन्ट्रोल फिडिंग करायला" अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.