Raj Thackeray : 'वेळ पडल्यास रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची DNA टेस्ट करा'; राज ठाकरेंचं CM फडणवीसांना पत्र, वंदे मातरमवरून केंद्र सरकारलाही सुनावलं

Child Kidnapping Gangs : 'केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी.
MNS chief Raj Thackeray addressing a public issue through a letter to CM Devendra Fadnavis, highlighting the rising cases of child kidnapping in Maharashtra.
MNS chief Raj Thackeray addressing a public issue through a letter to CM Devendra Fadnavis, highlighting the rising cases of child kidnapping in Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Dec : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित एक महत्त्वाची मागणी केली आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यात लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या वाढल्या असून त्यांच्यावर काहीतरी ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिवाय विधिमंडळात अशा विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी करताना त्यांनी राज्याचं हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

राज ठाकरेंच्या पत्रात नेमकं काय?

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, 'एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३० टक्क्यांनी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत.

आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही. लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे.

मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत, त्याचा तपशील सांगितला जातो. पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते?

MNS chief Raj Thackeray addressing a public issue through a letter to CM Devendra Fadnavis, highlighting the rising cases of child kidnapping in Maharashtra.
Akola Politics : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! महापालिकेतील गटनेत्यासह नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही?', असे प्रश्न राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून उपस्थित केले आहेत.

त्यांनी पुढं लिहिलं की, आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत, यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे.

MNS chief Raj Thackeray addressing a public issue through a letter to CM Devendra Fadnavis, highlighting the rising cases of child kidnapping in Maharashtra.
RSS : संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक; अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा दांडी मारणार की हजेरी लावणार? अमोल मिटकरींनी केलं स्पष्ट

त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे.

तर आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे, असं पत्र राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या पत्रानुसार राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकार काही ठोस पावलं उचलणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com