Shivsena UBT Vs BJP : 'मोदींनी 10 वर्षांत पेरलेलं विष उगवलं...' राहुल गांधींवरील टीकेचा 'सामना'मधून समाचार

Saamana Editorial on PM Narendra Modi : 'राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देऊ, अशी भाषा मिंधे गटाचे आमदार करतात. तर दिल्लीतील भाजपचे एक आमदार धमकी देतात की, राहुल यांची अवस्था त्यांच्या आजी इंदिरा गांधींसारखी करू. ही धमकी म्हणजे गांधी यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे.'
Anil Bonde, Narendra Modi, Sanjay Gaikwad, Rahul Gandhi, Sanjay Raut
Anil Bonde, Narendra Modi, Sanjay Gaikwad, Rahul Gandhi, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 19 Sep : 'लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत भाजप व त्यांच्या गोतावळ्याने केलेली वक्तव्ये भयंकर आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत जे विष पेरले ते कसे उगवले आहे याचे चित्र मागच्या काही दिवसांत दिसले'; अशा शब्दात शिवसेना ठाकरेच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

'फेक नरेटिव्ह' निर्माण करण्याच्या कारखान्याचे मालक मोदी, शहा व फडणवीस आहेत. त्यांनी राहुल गांधी हे आरक्षणविरोधी असल्याचा प्रचार सुरू केल्याची टीकाही या अग्रलेखात करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी परदेशात आरक्षणासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून देशातील राजकारण तापलं आहे. गांधींच्या या वक्तव्याचा निषेध करताना मात्र राजकीय नेत्यांनी पातळी सोडून टीका केली आहे.

शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तर राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देऊ, असं धक्कादायक वक्तव्य केलं. तर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी गायकवाडांच्या पुढे एक पाऊल टाकत राहुल गांधींच्या जीभेला चटके द्यायला पाहिजेत असं वक्तव्य केलं. याच सर्व वक्तव्यावर सामनाच्या अग्रलेखातून रोखठोक भाष्य करत भाजप आणि महायुतीवर सडकून टीका करण्यात आली आहे.

मोदी, शहा व फडणवीस ‘फेक नरेटिव्ह’च्या कारखान्याचे मालक

'लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत भाजप व त्यांच्या गोतावळ्याने केलेली वक्तव्ये भयंकर आहेत. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या दहा वर्षांत जे विष पेरले ते कसे उगवले आहे याचे चित्र मागच्या काही दिवसांत दिसले. आरक्षणासंदर्भात गांधी यांनी परदेशात केलेले विधान भाजपवाल्यांनी देशात मोडून तोडून समोर आणले.

Anil Bonde, Narendra Modi, Sanjay Gaikwad, Rahul Gandhi, Sanjay Raut
Congress Vs BJP : ...मोदी, शाह अन् फडणवीस आताही तुम्ही मूग गिळून गप्प बसणार का? काँग्रेस नेत्यानं झापलं

गांधी हे देशातील आरक्षण संपवायला निघाले आहेत व आम्ही ते होऊ देणार नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. ‘फेक नरेटिव्ह’ निर्माण करण्याच्या कारखान्याचे मालक मोदी, शहा व फडणवीस असे लोक आहेत व त्यांनी गांधी हे आरक्षणविरोधी असल्याचा प्रचार सुरू केला. इथपर्यंत सर्व ठीक, पण आता भाजप व त्यांच्या लोकांनी गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्ये करायला सुरुवात केली.

राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देऊ, अशी भाषा मिंधे गटाच्या एका आमदाराने केली, तर भाजपचे एक ‘बोंडे’ खासदार सांगतात, जीभ कापण्याची गरज नाही. जिभेला चटके देऊ. त्याच वेळी दिल्लीतील भाजपचे एक आमदार धमकी देतात की, राहुल यांची अवस्था त्यांच्या आजी इंदिरा गांधींसारखी करू. ही धमकी म्हणजे गांधी यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे. इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती व राहुल गांधी यांनाही त्याच मार्गाने जावे लागेल, असे भाजपचे आमदार सांगतात.'

भाजपचे (BJP) मानसिक संतुलन कोलमडले आहे व वरपासून खालच्या स्तरापर्यंत या कोलमडलेल्या मनाची प्रचीती लोकांना रोज येत आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत व त्यांच्या पक्षाचे शंभर खासदार निवडून आले आहेत. सरकारच्या खोट्या व चुकीच्या गोष्टींची गय न करता त्यांनी मोदी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. त्यांचे हे कर्तव्यच आहे व भारतीय संविधानाने त्यांना हा अधिकार दिला आहे. विरोधी पक्षनेते संविधानाने दिलेल्या अधिकाराचे पालन करत आहेत. त्यामुळे चिडलेला भाजप त्यांची जीभ कापणार असेल तर या देशात इदी अमिनशाही सुरू आहे हे मान्य करावे लागेल.

Anil Bonde, Narendra Modi, Sanjay Gaikwad, Rahul Gandhi, Sanjay Raut
Anil Bonde Vs Yashomati Thakur : खासदार अनिल बोंडेंविरुद्ध गुन्हा; पोलिस कारवाईसाठी 'अ‍ॅक्शन मोड'वर

गांधी यांनी आरक्षणाबाबत मत मांडले, ते चुकीच्या पद्धतीने समोर आणले गेले. त्याचा प्रतिवाद न करता जीभ कापण्याची व चटका देण्याची भाषा करायची हा कोणता कायदा? प्रश्न राहुल गांधींचा नसून देशातील लोकशाही परंपरेचा आहे. देशातील आरक्षण संपवायचा अधिकार कुणा एका व्यक्तीला व त्याच्या पक्षाला नाही. दलित, शोषित, भटके, विमुक्त, आदिवासी, ओबीसी व आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना स्वाभिमानाने जगण्यासाठी भारतीय संविधानाने आरक्षण दिले आहे. ते कुणाच्या बोलण्याने व भाषणाने कसे रद्द होणार?

जातीय दंगली घडवायच्या आहेत

पण भाजपवाले खोटे बोलण्यात व फेक नरेटिव्ह निर्माण करण्यात वस्ताद आहेत. त्यांना जातीय दंगली घडवायच्या आहेत व त्यासाठी ते संधी शोधत आहेत. मुख्य म्हणजे राहुल गांधी यांच्यासह मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना भाजपने वधस्तंभावर चढवायचे ठरवले आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोदी यांचा तसा पराभवच केला. तरीही त्यांचे डोके भलत्याच दिशेने चालत आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याची भाषा भाजपचे पुढारी व त्यांच्या गोतावळ्यातील लोक करतात. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा त्यावर बोलायला तयार नाहीत. म्हणजे या हिंसक वक्तव्यांना व गांधींवरील हल्ल्याचे कारस्थान रचणाऱ्यांना मोदी-शहांचा छुपा पाठिंबा आहे असे समजायचे काय? महाराष्ट्रात राहुल गांधींवर हिंसक हल्ल्याची भाषा होते. गांधींवर हल्ला करणाऱ्यांना इनाम देण्याची घोषणा करणाऱ्यांना गृहमंत्री फडणवीस संरक्षण देत असतील तर या राज्यात विरोधी पक्ष सुरक्षित नाही. मोदी यांनी विष पेरले, ते उगवले आहे, अशा शब्दात मोदींवर अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com