Saif Ali Khan Attack : "एकाची हत्या आणि दुसऱ्याच्या..."; सैफवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचं CM फडणवीसांकडे बोट
Mumbai News, 16 Jan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) एका चोराने त्याच्या घरात घुसून चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघाले आहेत हे दिसत असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी जिथे हाई प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय? असा सवाल उपस्थित केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा हल्ला म्हणजे पंतप्रधान मोदींना धक्का असल्याचं म्हटलं आहे. अशातच आता या हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सैफवर झालेल्या हल्लावर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, मुंबईतील कायदा सुव्यवस्था किती ढासळत आहे याचे हे लक्षण आहे. मध्यंतरी याच भागात एकाची हत्या झाली आणि हा आता दुसरा हत्येचा प्रयत्न करण्यात आला. या घडत असलेल्या सर्व गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघितलं पाहिजे कारण गृहखाते त्यांच्याकडे आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोट केलं.
नेमका काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानच्या घरात मध्यरात्री एक अज्ञान व्यक्ती घुसला. यावेळी त्याचा मोलकरणीसोबत वाद झाला. हा आवाज ऐकून सैफ तिथे पोहोचला आणि त्याने त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्याने सैफवर धारदार शस्त्राने सहा वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे.
वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
वर्षा गायकवाड यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, जिथे लोकप्रतिनिधी, हाई प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला नको का? सैफ अली खान यांच्यावरील चाकू हल्ला अतिशय भयानक आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.
वांद्रेसारख्या परिसरात एका लोकप्रतिनिधीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो. कायद्याचे पालन करणारे राज्य म्हणून आपण नेहमीच अभिमानानं महाराष्ट्राकडे पाहत आलो. पण आता परिस्थिती खरोखरंच हाताबाहेर जात चालली आहे. गुन्हेगारांना कोणाचं पाठबळ मिळतंय, यांना कायद्याचा जरा ही धाक राहिलेला नाही? महाराष्ट्रात जे घडत आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे, असं म्हणत गायकवाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

