
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदार संघ आणि पालघर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या ताब्यात असून यावर आता भाजपाने दावा ठोकला असल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा 2024 च्या निवडणूका लक्षात घेता भाजपाच्यावतीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील 16 मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री यांचा दौरा होणार असून यामध्ये कल्याण व पालघर मतदार संघाचा देखील समावेश आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. या राजकीय उलथापालथीनंतर आता भाजपाने शिंदे यांचे पुत्र असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कल्याण मतदार संघ व भाजपातून शिवसेनेत गेलेले राजेंद्र गावीत यांचा पालघर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे शिंदे गटाची दोर भाजपाच्या हातात गेली आहे का? या चर्चांना उधाण आले आहे. (Devendra Fadnavis-Eknath Shinde Latest News)
येत्या रविवारपासून माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचा 11 ते 13 सप्टेंबर असा दौरा कल्याण लोकसभा क्षेत्रातील कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर शहरात होणार आहे.
लोकसभा मतदार संघ आणि ग्रामीण भागात ठाकुर हे फिरणार असून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटी घेतली. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, नागरिक यांच्याशी देखील मंत्री चर्चा करणार आहेत. या दौऱ्याची माहिती मंगळवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत भाजपा आमदार संजय केळकर यांनी दिली. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मिहिर देसाई यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने राज्यातील 16 मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. या 16 मतदार संघात कल्याण आणि पालघर मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. आमदार केळकर यांनी दौऱ्याविषयी माहिती देताना म्हणाले, 16 मतदार संघातून कमळ निवडून गेले पाहीजे, त्यादृष्टीने पक्षाचे नियोजन झाले असून कार्यकर्त्यांनी काम देखील सुरु केले आहे. कल्याण व पालघर मतदार संघात शतप्रतिशत भाजपा विजयी कसे होईल या दृष्टीने भाजपा प्रयत्नशील असून या पार्श्वभूमीवर याठिकाणी केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यावरुन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलेले नाहीत,अशा मतदार संघावर आपले लक्ष केंद्रीत केले असल्याचे दिसते. या मतदार संघात कमळ फुलविण्यासाठी बुथ यादींची चाचपणी झाली आहे. शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी करत एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिंदे गट व फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना कोणाची याबाबत न्यायालयीन लढा सुरु आहे. असे असताना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ आहे. हा मतदार संघ गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात असून दोन टर्म खासदार शिंदे हे या संघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत.
ठाणे जिल्ह्याचे 2014 ला विभाजन करुन पालघर विभक्त करीत पालघर जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचा विजय झाला होता. अनेक वर्षापासून पालघर लोकसभेची जागा ही भाजपा लढवित होते. 2019 च्या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा शिवसेना लढविणार असे सांगत ही जागा शिवसेनेच्या ताब्यात घेतली होती. भाजपामधून शिवसेनेत गेलेले खासदार राजन गावित यांचा 2019 च्या निवडणूकीत विजय देखील झाला होता. गावित यांच्या विजयासाठी ठाकरे यांच्यासह शिंदे यांनी प्रचार सभा घेत मेहनत घेतली होती.
शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या या दोन्ही मतदार संघात भाजपाने मोर्चेबांधणी सुरु केल्याने राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरु झाली आहे. शिंदे गट या दोन्ही मतदार संघावरील आपला दावा सोडणार का? मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र हे कल्याण मतदार संघ सोडून ठाणे मतदार संघावर लक्ष केंद्रीत करणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपाच्या या जागांवरील दाव्यामुळे शिंदे गटाची दौर भाजपाच्या हातात गेली असल्याच्या देखील चर्चांना उधाण आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.