
Thane Politics : राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा कोणी कायमचा मित्रही नसतो. याचीच प्रचिती ठाण्यात दिसून आली. एकेकाळी घट्ट मैत्री असलेले आणि नंतर हाडवैरी बनलेले शिवसेना आमदार, मंत्री प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात पुन्हा एकदा मैत्रीचे बंध जुळले आहेत. इतकेच नाही तर ही मैत्री अखंड ठेवण्याचे साकडेही त्यांनी तुळजाभवानीकडे घातले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पाचपाखाडी येथे तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोधार मोठ्या थाटात पार पाडला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नाने या मंदिराची पुनर्बांधणी झाल्याने सोहळ्याची सर्व जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थिती सोहळाही अतिभव्य स्वरुपात पार पाडला. हे मंदिर सर्वांचे आहे, अशी साद त्यांनी आधीच घातली होती. त्यानुसार त्यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते.
या आमंत्रणाला मान देत परिवहनमंत्री सरनाईक यांनीही हजेरी लावली. यावेळी या दोघांनी सब गिले शिकवे भुल के जुन्या मैत्रीची आठवण काढली. आमच्या मैत्रीत मध्यंतरी दुरावा आला होता, पण आमचे 40 वर्षांचे कौटुंबिक नाते आम्ही जपले आहे. हे नाते असेच टिकून राहू दे, अशी प्रार्थना आपण तुळजाभवानीकडे केली असल्याचे या वेळी प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच आव्हाड यांच्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण व्हाव्यात, अशीही प्रार्थना त्यांनी केली.
खरंतर 40 वर्षांपूर्वी आव्हाड आणि सरनाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झाला. दोघेही राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्ते होते. दोघे चांगले मित्रही होते. पण महापालिकेच्या एक निवडणुकीत दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि संबंध इतके ताणले गेले की सरनाईक यांनी आव्हाड यांच्या वर्चस्वाला कंटाळून राष्ट्रवादी सोडली आणि शिवसेनेचा रस्ता धरला. सरनाईक हे ओवळा-माजिवाडा मतदारसंघातून तर आव्हाड हे मुंब्रा-कळवाचे आमदार झाले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे विरोधी पक्ष असल्याने दोघांच्या 'वैरा'ला राजकीय धारही मिळाली. सलग नऊ वर्षे या दोघांचा संवादही नव्हता. 2021 मध्ये राजकीय उलथापालथ झाली. महाविकास आघाडी बनल्यामुळे कालचे विरोधक असलेली शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले. दोघांनी अबोला पुन्हा सोडला. गृहनिर्माणमंत्री झालेल्या आव्हाड यांनी सरनाईक यांच्या मतदारसंघात असलेल्या वर्तकनगर पोलिस वसाहतीचा कायापालट करणारा प्रकल्प हाती घेतला.
2022 मध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेचे दोन गट झाले. सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली, तर जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्यासोबत कायम राहिले. त्यामुळे पुन्हा दोघेही पुन्हा विरोधक बनले. पण या वेळी जुळलेली मैत्री या दोघांनी कायम ठेवण्याचे ठरवले आहे. म्हणूनच सरनाईक यांनी आयोजित केलेल्या उपवन फेस्टिव्हलला आव्हाड यांनी भेट देत सर्वांना चकीत केले. त्यानंतर हे दोघे बुधवारी मंदिरात एकत्र दिसले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.