
Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर चारशे प्लसचा नारा दिलेल्या भाजपची पुरती दमछाक करत विरोधकांच्या इंडिया आघाडीनं देशभरात 232 जागा जिंकत दमदार कामगिरी केली होती. पण लोकसभेतील यशानंतर महाराष्ट्रासह झालेल्या इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी चांगलीच बॅकफूटला गेली होती. मात्र,उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) इंडिया आघाडीच्या विखुरलेल्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. यानंतर आता इंडिया आघाडी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारविरोधात ताकद एकवटून मैदानात उतरली आहे.
उद्धव ठाकरे हे नुकताच तीन दिवसीय दिल्ली दौरा पूर्ण करुन मुंबईत परतले आहेत. या दिल्लीत दौऱ्यादरम्यान राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीच्या गोटात अनेक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्याचं दिसून आलं.यात मुख्य म्हणजे ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या बैठकी अगोदर खासदारांशी संवाद साधला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सहकुटुंब भेटही घेतली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही भेट घेतली.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. मात्र, या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागे बसवण्यात आल्याचा फोटो व्हायरल झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून ठाकरेंना टार्गेट करण्यात येत आहे.
पण याच बैठकीनंतर इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मोदी सरकारला घाम फोडण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपनं संगनमत करत मतांची चोरी केल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल असल्याचं वारंवार दिसून आलं आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही सातत्यानं महाराष्ट्रातील निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभं करत महायुतीच्या विजयावरच शंका घेतानाच निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याचं नेहमीच पाहायला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) बैठकीअगोदर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी या दोन प्रमुख नेत्यामंध्ये झालेल्या स्वतंत्र बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.
उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी गेल्या आठवड्यात झालेल्या स्वतंत्र बैठकीत निवडणूक आयोगाविरोधातील संघर्ष अधिक तीव्रतेनं पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडी येत्या सोमवारी (ता. 11 ऑगस्ट)निवडणूक आयोगविरोधात भव्य मोर्चा काढणार आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुक आयोगाविरोधात विरोधकांनी एवढा मोठा मोर्चाचं आयोजन करत एल्गार पुकारल्याचं दिसून येणार आहे.
याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी(ता.9) मीडियाशी संवाद साधताना माहिती दिली. राऊत यावेळी उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं, काय ठरलं, हेही समोर आणलं. त्यांनी ठाकरे-गांधी यांच्या बैठकीत निवडणूक आयोगाच्या मतांच्या घोटाळ्याविरोधात विरोधकांची लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
राऊत पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्लीत मुक्कामी होते, त्यांना राहुल गांधींनी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. तसेच उद्धव ठाकरे तिथे आले, यानंतर राहुल गांधींच्या निवासस्थानी स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यासंदर्भातील स्पेशल प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं. आम्ही ते नीट पाहिलं, समजून घेतल्याचंही राऊतांनी यावेळी म्हटलं.
यानंतर भोजन व नंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मोजक्या लोकांची एक बैठक झाली. त्या बैठकीला राहुल गांधी, खर्गे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, इतर प्रमुख नेते उपस्थित होतो. त्या बैठकीत महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाची पुढील रूपरेषा ठरली असून विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चाही झाल्याचं राऊत यांनी सांगितले.
यावेळी संजय राऊतांनी येत्या 11 तारखेला निवडणूक आयोगवर सर्वपक्षीयं मोर्चा (इंडिया ब्लॉक) हे काढण्याचं नक्की झाल्याची माहिती दिली आहे. या मोर्चाला शिवसेनेसह सगळ्याच पक्षांचे खासदार, प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार असल्याचं राऊत म्हणाले. यावेळी राऊतांनी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे घोटाळा बाहेर काढण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मेंदूतील जी चीप आहे, ती डिस्टर्ब झाली आहे. आमची डोक्यातील चीप बरोबर असल्याचा टोला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.