

नवनीत बऱ्हाटे :
Ulhasnagar politics : राज्याच्या राजकारणाचे केंद्र आता केवळ मुंबई- पुण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळे उल्हासनगर हे शहर भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वादाचा केंद्रबिंदू बनले आहे. 'भाजप-शिवसेनेतील फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात उल्हासनगरातून झाली,' हे मुख्यमंत्र्यांचे विधान राज्यभरातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.
राज्यात महायुती सत्तेत असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांमधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला असून, उल्हासनगर शहर या तणावाचे प्रमुख केंद्र ठरले आहे. १३ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी नगरसेविका मीना सोंडे, माजी नगरसेवक किशोर वनवारी या दोन प्रभावी नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे उल्हासनगर भाजपमध्ये (BJP) मोठी अस्वस्थता निर्माण झाली.
त्याच्या दुसऱ्या दिवशी टीम ओम कलानीने भाजपला मोठा धक्का देत चार ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवकांना आपल्या गटात सामील केले. जमनू पुरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश मखिजा राम पारवानी यांनी प्रवेश केला. हा प्रवेश टीओके मार्फत झाला असला तरी, या नेत्यांनी शिवसेनेचा (Shivsena) झेंडा हाती घेतला. या सोहळ्याला खासदार डॉ. शिंदे यांची उपस्थिती होती.
शिंदेच्या या धक्क्यांनंतर भाजपनेही प्रतिहल्ला करत कल्याण-डोंबिवलीसह इतर शहरांमधून शिंदे गटातील अनेक नेत्यांना पक्षात घेतले. यामुळे शिंदे गटात तणाव वाढला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अर्धी शिवसेनाच भाजपमध्ये घेणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली. यामुळे शिंदे पिता-पुत्र कमालीचे अस्वस्थ झाले होते.
स्फोटक वातावरणानंतर मुंबईत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक झाली. पुढील काळात दोन्ही पक्षांनी परस्परांची संमती घेतल्याशिवाय नेते-कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश थांबवावेत. महायुतीची प्रतिमा बिघडवणारे सर्व संघर्ष थांबवावेत, असे या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उल्हासनगरमध्ये निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी, या आठवड्यातील घडामोडींमुळे हे शहर राजकारणातील सर्वात महत्त्वाचे 'हॉटस्पॉट' ठरले आहे.
वाढत्या तणावाचा परिणाम म्हणून, शिंदे गटातील काही मंत्री मुंबईतील कॅबिनेट बैठकीस गैरहजर राहिले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, "भाजप युतीधर्म पाळत नाही," अशी तक्रार केली. या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट आणि ठाम उत्तर दिले, “फोडाफोडीची सुरुवात तुम्हीच उल्हासनगरातून केली. हे विधान जाहीर होताच, उल्हासनगर हे शहर राज्यातील महायुतीच्या वादाचा केंद्रबिंदू बनले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.