
Prakash Mahajan: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांना पक्षाकडून इगतपुरीत सुरु असलेल्या शिबिराला बोलवण्यात आलं नव्हतं. पक्षाला आपली गरज वाटली नसेल अशा शब्दांत महाजन यांनी यावर नाराजी व्यक्त करत आपल्या मनातील खदखद माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. यानंतर मनसेतील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या या नाराजाची गंभीर दखल घेतली. मनसेचे युवा नेते आणि अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी महाजन यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली तसंच त्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. याचा तपशील सांगताना महाजन यांनी मनसेत राहणार? की जाणार? याबाबत सूचक भाष्यही केलं आहे.
साम टीव्हीशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, "मला काल रात्री अमित ठाकरे यांचा फोन आला त्यांनी माझं सर्वकाही ऐकून घेतलं. काही गोष्टी मला विचारल्या, काही गोष्टी मला सांगितल्या. मला या गोष्टीचं बरं वाटलं की ते म्हटले मी तुम्हाला भेटायला येतो. पक्षातील तरुण नेते जर आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला सांभाळून घेत असतील त्यांच्याकडं लक्ष देत असतील तर ही आनंदाची गोष्ट आहे. आज सकाळी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र बाळा नांदगावकर यांचाही मला फोन आला होता. माझ्या ज्या काही भावना आहेत त्या मी त्यांना बोलून दाखवल्या, त्यावर आता ते विचार करतील.
त्यांच्याशी जी चर्चा झाली ती जाहीर बोलण्याचा काही विषय नाही. पण मी माझं स्पष्टीकरण त्यांना दिलं तसंच त्यांच्याजागी ते ही योग्य होते. त्यांनी म्हटलं की, प्रसार माध्यमांकडं ही गोष्ट जायला नको होती. खरंतर मी प्रसारमाध्यमांकडं ही गोष्ट नेलीच नाही. उलट प्रसारमाध्यमांना माहिती झालं माझा आपमान झाला, मला शिबिराला बोलावलं नाही, म्हणून त्यांनी माझ्याकडं विचारला केली. तर त्यावर मला स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. ठीक आहे, ज्या प्रवक्तेपणामुळं हे सर्वकाही घडलं त्यावर आता काय करणार? आता अमित ठाकरेंशी भेट होईल, त्यांनी काही काम नाही सांगितलं तरी शेवटी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक म्हणून तर कायम राहू शकतो"
इगतपुरीच्या शिबिराला मनसेच्या एकूण ८ प्रवक्त्यांपैकी ७ प्रवक्त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यामध्ये प्रकाश महाजनांना डावलण्यात आलं होतं. यावर बोलताना महाजन यांनी सांगितलं की, "या प्रवक्त्यांवर पक्षामध्ये इतरही जबाबदाऱ्या आहेत पण माझ्याकडं इतर कुठलीही जबाबदारी नसल्यानं त्यांना या शिबिरासाठी निमंत्रण देण्यात आलं असावं. मी मनसेचा फक्त प्रवक्ता असल्यानं पक्षाच्या कुठल्याही धोरणात्मक बाबीत मला बोलावलं जात नाही. हे दुर्देवी क्षण आहेत माझ्याबाबतीत, यावर आता काय बोलणार? अशा शब्दांत अत्यंत भावूक होत प्रकाश महाजन यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता.
त्यांनी असंही म्हटलं होतं की, "नाशिकमध्ये शिबिर आहे पक्षानं घरच्या व्यक्तीला बोलावलेलं नाही, पण सगळ्या जगाला बोलावलं आहे. पण मी इतर कोणावर नाराज नाही, माझा माझ्यावरच नाराज आहे. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला अभिमान वाटेल किंवा गर्व वाटेल असंच मी प्रवक्ता म्हणून काम केलं आहे. भविष्यात ते अभिमानानं सांगतील की प्रकाश महाजन नावाचा एक प्रवक्ता आमच्याकडं झाला. पण मी देव बदलणार नाही, पण देवानं बोलावल्याशिवाय देवळात सुद्ध जाणार नाही. आपलं भांडण नशिबाचं असतं तर तिथं माणसाची हार असतेच"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.