
Pune News : वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांकडून सातत्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीकेची जोड उठवण्यात येत आहे. अशातच भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी मात्र चाकणकर (Rupali Chakankar) यांची पाठराखण करत या प्रकरणात फक्त एकालाच टार्गेट करणं चुकीचं असल्याचं सांगत भरोसा सेलसह इतर यंत्रणांची देखील चौकशी करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.
भाजप नेत्या आणि विधान परिषदेचे आमदार चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष असताना रूपाली चाकणकर या पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष होत्या. त्यानंतर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या नंतर रूपाली चाकणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. त्यानंतर अनेक प्रकरणांमध्ये या दोन्ही महिला नेत्या एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, सध्या या दोन्ही महिला नेत्या महायुतीचा घटक असल्याने एकमेकांवर टीका करणं टाळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
चित्रा वाघ यांनी मंगळवारी (ता.27) वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, अतिशय अमानवीय आणि राक्षसी पद्धतीने वैष्णवीला हगवणे कुटुंबीयांनी मारला आहे. तिची हत्या केली आहे. त्यामुळे या सर्वांना मरतोपर्यंत फाशी व्हावी हीच सर्वांची इच्छा आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणांमध्ये योग्य त्या ॲक्शन घेतल्या आहेत. कोणीही, कितीही मोठा असो वा कोणाच्या ताटात जेवणार असो मात्र त्याला सोडलं जाणार नाही. या प्रकरणांमध्ये हगवणे कुटुंबातील दोषी असलेल्या सर्वांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना फरार असताना मदत करणाऱ्यांच्या देखील मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत. पोलीस तपास योग्य दिशेने सुरू असून अजून आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर ही योग्य ती कारवाई करण्यात येईल असं चित्रा वाघ म्हणाल्या.
या 21व्या शतकात देखील मुलीला इतक्या अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे यावर विश्वास बसत नाही. एखाद्या जनावराला देखील इतक्या अमानुषपणे मारहाण केली जात नाही. त्यामुळे यातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे.
तसेच या प्रकरणांमध्ये कस्पटे कुटुंबीयांकडून सरकारी वकील म्हणून राजेश केवाडिया यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी आहे. या मागणी वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य ती कारवाई करतील असा आम्हाला विश्वास असल्याचं चित्र वाघ म्हणाल्या.
महिला आयोगावर या प्रकरणाच्या अनुषंगाने होत असलेल्या आरोपांबाबत विचारला असता चित्रा वाघ म्हणाल्या, मयुरी जगताप या फक्त महिला आयोगाकडे गेल्या नव्हत्या तर त्या भरोसा सेल कडे देखील गेल्या होत्या. तसेच त्या पोलीस स्टेशनला देखील गेल्या होत्या. त्यामुळे ज्या ज्या एजन्सीज प्रकरणात इनवर्ल्ड होत्या. त्या सगळ्याच एजन्सीची चौकशी झाली पाहिजे.
मयुरी हिला भरोसा सेलमधून भरोसा का देण्यात आला नाही? त्या ठिकाणी कोणत्या पोलीस कर्मचारी होत्या हे देखील पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे एकालाच टार्गेट करून जमणार नाही. सगळ्याच एजन्सीची ही जबाबदारी होती. त्यामुळे सगळ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.