

Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजासाठी लागू केलेल्या नव्या आठ योजनांनंतर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. त्यांनी शनिवारी (6 जून) पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर निशाणा साधला. "कालचा सरकारचा निर्णय हा असंवैधानिक असून हे सरकार झुंडशाहीला बळी पडलं आहे, जरांगेसमोर लाचार झालं आहे," असा आरोप हाके यांनी केला.
ज्या योजना ओबीसी समाजासाठी आहेत, त्याच योजना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. ओबीसींना दिलेल्या योजना या अभ्यासपूर्ण आहेत, याच योजना मराठा समाजासाठी जाहीर करत आहे त्याचे लॉजिक आम्हाला कळलं नाही. मराठा समाज त्या नियमांमध्ये बसतो का? ही तर शासनाची वैचारिक दिवाळखोरी आहे, असा हल्लाबोलही हाके यांनी केला.
ओबीसी योजनांच्या श्वेतपत्रिका जाहीर करा :
हाकेंनी सरकारच्या निधी वाटपावरही बोट ठेवले. "अनेक महामंडळांना अपुरा निधी असताना, मराठा समाजाला एवढा निधी का? ओबीसी लोकांना काय दिलं आहे त्याची श्वेतपत्रिका जाहीर करा" अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना काही वेगळं मिळत असेल तर आमचा विरोध नाही मात्र हे देताना काय निकष लावला आहे? कुठल्या तत्वावर तुम्ही हे दिलं? कुठल्या समितीची शिफारस होती? असा सवाल त्यांनी केला.
भाजप आता काँग्रेसयुक्त झाली :
भाजपवर टीका करताना हाके म्हणाले, "आजची भाजप ही जुनी भाजप राहिली नाही, ती आता 'काँग्रेसयुक्त' झाली आहे. त्यांचा कसला डीएनए ओबीसी समाजाचा आहे? हे सरकार निवडणुका, मतं आणि झुंडशाहीला घाबरलंय, जरांगेनी महिन्याला आंदोलन करावं आणि आरक्षण सगळं संपवून टाकावं.'' असं म्हणत 'आम्ही पण आता आंदोलन करणार', असाही इशारा त्यांनी दिला.
तर ओबीसी म्हणवून घ्यायचं बंद करा :
मराठा समाजाला काय दिलं काय नाही हे सोडा पण ओबीसी समाजाला तुम्ही आतापर्यंत काय दिलं हे सांगा. नेतेमंडळींना त्यांच्या त्यांच्या भूमिका विचारा. आम्ही अनेकदा विचारतो की तुम्ही ओबीसी नेते असून का बोलत नाही? ओबीसी संदर्भात प्रश्न विचारायला महाराष्ट्राचा एक नेता समोर येत नाही हे दुर्दैव आहे. चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ, गणेश नाईक, पंकजा मुंडे, संजय राठोड, गुलाबराव पाटील ओबीसी बद्दल तुम्ही बोलणार आहात की नाही? हे तुम्ही सांगा तुम्ही बोलणार नसेल तर तुम्ही ओबीसी म्हणवून घ्यायचं बंद करा, अशी टीका हाके यांनी केली.
मराठा समाजासाठी 8 योजना :
30 मे रोजी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अवघ्या पंधरा तासांत संपले. सरकारने बारा मुद्यांचा मसुदा जरांगे पाटील यांना देऊन त्यावर जरांगे पाटलांनी सहमती दर्शवल्यास अंमलबजावणी करण्याची लेखी हमी दिली होती. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. सरकारनेही मराठा समाजाला दिलेला शब्द पाळत लेखी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सूरू केली. त्यानुसार सरकारने मराठा समाजासाठी आठ योजना जाहीर केल्या आहेत.
जरांगे पाटलांनी मानले आभार :
दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचे विशेष आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचेही आभार मानतानाच आता ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या योजना बंद होऊ देऊ नका, एवढेच बारकाईने लक्ष ठेवा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.