

Pune News, 30 Aug : राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी आता कमाल वयोमर्यादा लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भातील नियम व अटी स्पष्ट केल्या आहेत.
शिक्षक भरतीसाठी वयोमर्यादेची अट असल्यामुळे अनेक पात्र उमेदवारांच्या नोकरीच्या संधीवर मर्यादा येत होती. राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, नववी ते बारावीच्या खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२च्या आधारे मुलाखतीशिवाय पदनिश्चितीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. मात्र, नियुक्ती देण्यापूर्वी उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वैध कागदपत्रे सादर करावी लागणार
इयत्ता पहिली ते पदवीसाठी महाटीईटी/सीटीईटी पेपर-१, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी संबंधित विषयानुसार पेपर-२ पात्रता आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक, व्यावसायिक, जात, जात वैधता, दिव्यांग तसेच समांतर आरक्षणाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे उमेदवारांना सादर करावी लागणार आहेत.
वयोमर्यादेबाबत नेमका नियम काय?
शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये नववी ते बारावीच्या सेवा शर्तींच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, शिक्षक पदासाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असणे आवश्यक आहे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या उमेदवारांसाठी पदवीधर श्रेणी असणे, तर इयत्ता नववी ते बारावीसाठी पदव्युत्तर श्रेणीतील अर्हता आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
२ ते ७ सप्टेंबरदरम्यान कागदपत्रांची पडताळणी
शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २ ते ७ सप्टेंबरदरम्यान करण्याचे नियोजन आहे. पात्र उमेदवारांसाठी पदस्थापनेचे समुपदेशन ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. उमेदवारांची संख्या कमी असल्यास सप्टेंबरपूर्वीच नियुक्तीची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कागदपत्र पडताळणीनंतर पात्र उमेदवारांची पोलिस चारित्र्य पडताळणी तसेच नियमानुसार वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नववी ते बारावीच्या शिक्षक भरतीसाठी कमाल वयोमर्यादेचा अडथळा दूर झाल्याने अनेक अनुभवी आणि पात्र उमेदवारांसाठी शिक्षक होण्याची संधी पुन्हा खुली झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.