
Laxman Hake News : राज्याच्या राजकारणात सध्या भारतरत्न पुरस्कार आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजी नाट्यावरून जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भुजबळ नाराज असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. तर मंत्रीपद नाकरल्यावरून देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याच विषयावरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी निशाण्यावर घेत टीकेची झोड उठवली होती. आता याच मुद्द्यावरून राज्यातील एका ओबीसी नेत्याने थेट महायुती सरकारला घेरलं असून सरकार समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याने फुले दांपत्यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भारतरत्न पुरस्कारावरून अनेकदा आरोप प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले आहेत. फुले दांपत्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणेच भारतरत्न द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तर आज (ता.३) सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ती पुन्हा एकदा या मुद्दा समोर आला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी याबाबत मुद्दा उचलून धरला आहे. तर सावित्रीबाई फुले यांचे काम मोठं असून फुले दांपत्य यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे. तर यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही हाके यांनी सांगितले आहे.
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये ओबीसीची बाजू मांडणारा नेता नाही. तशी बाजू मांडणारा नेता मंत्रिमंडळात हवा होता, अशी नाराजी व्यक्त केली आहे. तर या सरकारकडून ओबीसींवर अन्याय होतोय, असाही आरोप हाके यांनी केला आहे.
हाके यांनी, भुजबळ ओबीसींचे मोठे नेते असून त्यांनी रस्त्यावरची लढाई लढावी, असेही म्हटले आहे. तर मंत्रिमंडळामध्ये जन्माने ओबीसी नको, तर ओबीसींचे प्रश्न मांडणारा मंत्री हवा असा टोला देखील अतुल सावे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, यांचे नाव न घेता लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी समाजाने अजित पवारांकडे पाहून मतदान केलेले नाही. तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाहून मतदान केले आहे. यामुळे ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने तात्काळ प्रयत्न करावेत. ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण केलेली महा ज्योति सक्षम करावी, अशी मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांच्या मंत्री पदाबाबत देखील लवकर निर्णय घ्यावा, असेही आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले आहे.
मंत्रीपद हुकल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कोणतीच पावलं उचलली गेली नाहीत. यामुळे अस्वस्थ झालेल्या भुजबळ यांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली. यानंतर त्यांनी थेट सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बेट घेतली होती. या भेटीमुळे ते वेगळी चूल मांडतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा राजकीय क्षेत्रात रंगल्या होत्या.
दरम्यान भाजप भुजबळ यांचा सन्मान करत प्रवेश देईल असे वाटत नाही. कारण असे झाल्यास महायुतीत मीठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. तर भाजपमध्ये प्रवेश न देता त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी वेगळा निर्णय घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.