

Pune Palakhi News : ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातल्या मध्यवर्ती भागातील भवानी पेठेच्या निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम असतो. या सालाबादप्रमाणं येणाऱ्या या मुक्कामाला तब्बल ३५० वर्षांची परंपरा आहे. पण आता हा मुक्काम हलवण्याची चर्चा सुरु झाली आहे. याला पुण्यातील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. यासाठी विठोबा देवस्थान संस्थांच्या विश्वस्तांनी आणि स्थानिक नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा मुक्काम हलवू नये असं आवाहन केलं आहे. भाविकांच्या भावना आणि संत परंपरेचा मान राखावा अशी विनंतीही यावेळी मुख्यमंत्र्यांकडं करण्यात आली.
पालखी मुक्कामाचे ठिकाण बदलण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असल्याने भवानी पेठ परिसरात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवक विशाल धनवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. शिष्टमंडळात विठोबा देवस्थान संस्थानचे विश्वस्त आणि स्थानिक नागरिकांचा समावेश होता. भेटीदरम्यान सविस्तर चर्चा झाली. पालखी सोहळ्यात कोणतीही अडचण येऊ नये, वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून योग्य सुविधा आणि उपाययोजना करण्यात याव्यात, अशी विनंती यावेळी करण्यात आली. तसेच ३५० वर्षांची ही ऐतिहासिक परंपरा खंडित होऊ नये, भवानी पेठेतील पारंपरिक मुक्काम कायम ठेवावा, अशी मागणी शिष्टमंडळाने फडणीस यांच्याकडे केली.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं नगरसवेक धनवडे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात प्रशासनाला योग्य सूचना देऊन आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. संत परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेचा मान राखला जावा, हीच सर्वांची अपेक्षा असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
मंदिर गाभारा विस्तार : पालखी विठोबा मंदिर शेजारील १२२४ भवानी पेठ सदर मिळकत विकत घेऊन मंदिराचा गाभारा मोठा करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळं पालखी ज्या ठिकाणी उतरते ती जागा विस्तारित होणार आहे.
अनधिकृत बांधकाम हटविणे : पालखी कमानीतून आत येताना मार्गावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे काम महापालिकेने सुरू केले असून, आठ दिवसांत ते पूर्ण होईल.
मुख्य प्रवेशद्वार विस्तार : पालखी विठ्ठल मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार मोठा करण्याचे काम ४५ दिवसांत पूर्ण होईल. यामुळे पालखी आत येताना होणारी अडचण दूर होईल.
गर्दी नियंत्रण : मुक्कामी येणाऱ्या वारकरी व नागरिकांच्या दर्शनासाठी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तीन वेगवेगळ्या रांगा करण्याचे नियोजन. पादुका अभिषेकावेळी ४५ मिनिटे दर्शन रांग थांबवली जाते, त्यानंतर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी जागेवर पाहणी करून निर्णय घेण्यात येईल.
विश्वस्त व सेवेकऱ्यांची व्यवस्था : पालखीसोबत येणारे विश्वस्त आणि सेवेकरी यांच्यासाठी तळाजवळच राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात येईल.
दिंड्यांसाठी सुविधा : दिंड्यांसाठी मोठे प्रशस्त पॅक बंद मंडप, विद्युत व्यवस्था, २४ तास स्वच्छ पाणी आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था पुणे मनपाच्या माध्यमातून करण्यात येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.