
Baramati, 28 June : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मध्यस्थी केली होती. कारखान्याच्या 21 जागांपैकी 10 जागा आणि पहिले अडीच वर्षे चेअरमनपद, असा प्रस्ताव खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना (तावरे) दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा प्रस्तावही विरोधकांनी नाकारला, असा गौप्यस्फोट करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडद्यामागील घडामोडींवर भाष्य केले आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Malegaon Sugar Factory Election) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनेलने वीस विरुद्ध एक ने विजय मिळविला आहे. त्यानंतर सभासदांच्या आभार मेळाव्यात बोलताना कारखान्याच्या निवडणुकीवेळी पडद्यामागे घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधकांना माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते, त्यासाठी दोन्ही बाजूला प्रत्येकी दहा जागा आणि मी धरून 21 असे राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला होता. यासोबतच पहिली अडीच वर्षे चेअरमनपदाची संधीही विरोधकांना देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रस्ताव दिला होता.
महायुती म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र काम केले होते, त्यामुळेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तडजोडीचा विषय पुढे आला होता. पण, विरोधकांनी माझे आणि पृथ्वीराज जाचक यांचे सोडा, खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांचेही ऐकलं नाही. फडणवीसांनी दिलेला प्रस्ताव विरोधकांनी (तावरे) नाकारला, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, विरोधकांनी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांचाही प्रस्ताव नाकाल्यामुळे मी माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. माळेगाव कारखान्याची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार केला. त्याच निर्धाराने आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आणि माळेगावची निवडणूक जिंकली.
विरोधकांच्या डोक्यातील हवा सभासदांनी दणक्यात उतरवली
मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावामुळे विरोधकांना माळेगावच्या चेअरमनपदाची संधी आली होती. माळेगाव कारखान्याबाबत ‘छत्रपती’ प्रमाणे तडजोडीतून मार्ग काढावा, असा आग्रह देवेंद्र फडणवीसांचा होता. छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी तसे प्रयत्नही केले. मात्र, विरोधकांच्या डोक्यात वेगळीच हवा होती, सभासदांनी नेमकी तीच हवा एका दणक्यात उतरवली, असा टोलाही अजित पवारांनी विरोधकांना लगावला.
....अन् तुतारीवाल्यांसोबतची बोलणी फिस्कटली
अजित पवार म्हणाले, निवडणुकीच्या काळात मला तुतारीवाल्यांचे बारामती तालुकाध्यक्षही भेटले. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या लोकांची यादी मला दिली आणि सांगितले,‘हे आमचे उमेदवार आहेत, यातील तीन उमेदवार घ्या,’ अशी विनंती केली. त्यांचा मी आदर केला, पण त्यानंतर त्यांनी पुन्हा फोन केला आणि ‘गणपत देवकाते ॲड. राजेंद्र काटे यांच्या नावासाठी आग्रह धरला. मला ते आवडले नाही. त्यामुळे तुतारीवाल्यांच्या पक्षाबरोबर झालेली बोलणी फिस्कटली.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.