Rupali Chakankar Vs Chitra Wagh : अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काही दिवसांपूर्वी आमने सामने आल्या होत्या. त्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. यावेळी वाघांनी महिला आयोग आणि चाकणकरांवर गंभीर आरोपही केले होते. पण अखेर रुपाली चाकणकरांनी उर्फी जावेद प्रकरणावर बाळगलेलं मौन सोडलं असून महिला आयोगाची भूमिका स्पष्ट करतानाच वाघांना टोलाही लगावला आहे.
महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी 'सरकारनामा' विशेष या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी उर्फी जावेद प्रकरण, आयोगाचे निर्णय, चित्रा वाघांचे आरोप, नोटिसा यांवर चाकणकरांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्र फार सूज्ञ आहे. आरोप सुरुवातीला कुणी केले, कोणत्या विषयासाठी केले, कोणत्या व्यक्तीला समोर ठेवून केले, किती चुकीच्या पध्दतीने ते आरोप केले. महाराष्ट्राने पाहिलं आहे. महाराष्ट्राची जनता योग्यवेळी योग्य निर्णय देत असते.हे आपण पाहत आलोय. आय़ोगाने चुकीच्या पध्दतीने निर्णय दिले असे आऱोप केले होते. पण ज्यांनी कुणी हे आऱोप केले होते त्यांना आपण नोटिसा देखील पाठवल्या होत्या. आणि आयोगाच्या पदाचा गरिमा इतका मोठा आहे की, त्यांनी नोटिशीला उत्तरही दिले असा टोलाही रुपाली चाकणकरांनी(Rupali Chakankar) लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या बाबतीत फार आक्रमक होत्या. आणि भाजपचं सरकार असताना त्या शांत झाल्या आहेत पोलिसांची बाजू घेताना दिसताहेत यावर भाष्य केलं.
चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्रातील जनता फार सूज्ञ आहे. कारण विरोधात असताना आरोप करणं महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही आक्रमक होता, आणि स्वत:चं सरकार आल्यावर शांत बसणं याचाच अर्थ समजून जातो. माणूस विरोधकात असला की, विरोधकाची भूमिका म्हणून आरोप सत्य असो वा नसो फक्त आरोप करतच सुटणं हे काम त्यांनी काम केलं असावं. आणि आता स्वत:चं सरकार असताना जरी एखादी घटना चुकीची घडत असताना शांत बसणं ही त्यांची भूमिका असू शकते असंही त्यांनी यावेळी सांगितले.
नाहीतर दर आठवड्याला फायली घेऊन पत्रकार परिषदा घेऊन बसणं मलाही सहजच शक्य होतं. आणि प्रसिध्दीही मिळवता आली हा विषय नाही. पण पीडितांना न्याय देणं तेही कायद्याच्या चौकटीत राहून हे महिला आयोगाचं काम आहे आणि ते योग्य पध्दतीने करतोय अशीही भूमिका चाकणकरांनी मांडली.
महिला आयोगाचं अध्यक्षपद जाणार की राहणार? चाकणकर म्हणाल्या...
राज्यातील सत्तांतरांनंतर रुपाली चाकणकरांच्या महिला आयोगाचं अध्यक्षपद राहणार की जाणार यावरही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झडू लागल्या आहेत. मात्र, चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत महत्वपूर्ण विधान केलं आहे.
चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. मात्र, काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. यावेळी त्यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दादा भुसे यांना कार्यक्रमाला पाठविले. यावेळी भुसे यांनी आयोगाचं काम पाहिलं आणि समाधानही व्यक्त केले. त्यांनी तुम्ही चांगलं काम करत आहात. त्यामुळे बिनधास्त काम करा. आम्ही मंत्रिमंडळातील सर्व भाऊ तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वासही दिल्याचंही चाकणकर यावेळी म्हणाल्या. म्हणूनच आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर राहणार हे स्पष्ट झालं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.