
Pune News, 10 Aug : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात मंडल यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेची सुरुवात नागपूर येथून क्रांती दिनाच्या औचित्यवर करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमधे हिरवा झेंडा दाखवून या यात्रेची सुरुवात केली.
तर शरद पवारांच्या पक्षाने काढलेल्या मंडल यात्रेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. ही यात्रा ओबीसींचे विभाजन करून जरांगे यांच्या मोर्चाला मदत करण्यासाठी असल्याचा आरोप हाकेंनी केला आहे.
तसंच 'अघटीत वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था', असं म्हणत हाकेंनी पवारांवर टीका केली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, शरद पवार साहेबांनी आता ओबीसींची झुल पांघरली असून नागपूरमधून मंडल यात्रा सुरु केली आहे. इच्छाधारी नागाप्रमाणे भूमिका बदलण्यात शरद पवार हे पटाईत आहेत.
मनोज जरांगेंना मांडीवर घेऊन गोंजारनारे पवार अचानक ओबीसींची बाजू घेण्याच्या तयारीत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते ओबीसींचा विषय हाताळण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितले जातंय. पण पवारांची ही यात्रा म्हणजे जखम मांडीला आणि मलम दुसरीकडे कुठेतरी अशी परिस्थिती आहे.
ही म्हण वापरण्याचं कारण म्हणजे ओबीसी समाजाला देशोधडीला लावणारा माणूस आज यात्रा काढतोय, आमची मागणी साधी आहे. ओबीसी, भटके विमुक्त, मायक्रो ओबीसींसाठीच्या 20 महामंडळांना प्रत्येकी 500 कोटी निधी, महाज्योतीच्या इमरातीसाठी 2 हजार कोटींचा निधी. विद्यार्थ्यांसाठीच्या वस्तीगृहांसाठी मोक्याची जागा मिळावी.
ओबीसींबद्दल खरंच तळमळ असती तर यात्रा काढली नसती तर विरोधक शरद पवार म्हणून सरकारवर तुटून पडले असते पण नाही. आपल्या सख्ख्या पुतण्याचे चारभिंतीत कान धरले असते. निधी मंजूर करुन घेतला असता तर यात्रेची गरज भासली नसती, असा घणाघात हाकेंनी केला.
हाके पुढे म्हणाले, शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध करतात ही त्यांची ख्याती आहे. म्हणजे पवारांनी ओबीसींसाठी मोर्चा काढला, याचा उलटा अर्थ म्हणजे त्यांना जरांगेंना मदत करायची आहे. ती कशी? कारण जरांगे 29 ऑगस्टला मुंबईला मोर्चा काढत आहेत. त्यांच्या विरोधात ओबीसींनी एकदिलानं ताकद दाखवू नये.
ओबीसींमध्ये फुट पडावी आणि जरांगेंचा मोर्चा यशस्वी व्हावा. यासाठी शरद पवारांनी ही यात्रा काढली आहे का? हा मोर्चा काढावा म्हणून कोणता ओबीसी नेता त्यांच्या दारात गेला होता? याचं उत्तर शरद पवारांनी दिलं पाहिजे. असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
होय शरद पवार अँटी ओबीसीच आहे. पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी आपल्या सभा ओबीसी नेत्यांच्याच मतदारसंघात घेतल्या होत्या. ओबीसींसाठीच्या योजना, महामंडळं त्यांनीच बंद पाडली. ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ देण्याची युतीची परंपरा पवारांनी खोडून काढली. स्वतःच्या कुटुंब-भावकीचं, पै पाहुण्याचं राजकारण टिकवण्यासाठी ओबीसीं राजकारणाला संपवण्याचं काम पवारांनी केलं. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असंही हाकेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवारांचं आजवरचं राजकारण फोडा आणि राज्य करा असंच आहे. ओबीसींमध्ये फुट पाडून लाडक्या जरांगेचा हट्ट पुरवायचा आहे. हे न समजण्या इतका ओबीसी दुधखुळा नाही. येत्या निवडणूकीत शरद पवारांच्या फुटीतरतावादी राजकारणाला कायमचा पुर्णविराम लावण्याचं काम इथला जातीवंत ओबीसी करेल, असा हल्लाबोल हाके यांनी शरद पवारांवर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.