Solapur, 21 May : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर सोलापूर जिल्ह्यातील तीन आमदारांसह प्रमुख नेते सत्तेसोबत गेले, त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी ग्रामीण भागात ओस पडली होती. लोकसभा निवडणूक जाहीर होताच पवारांच्या पक्षाला पुन्हा बहर आला. केवळ माढा लोकसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री, माजी आमदारांसह पाच महत्वपूर्ण नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील झाले. तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील फडणवीसांचे निकटवर्तीय नेत्यालाही गळाला लावण्याचे महत्वपूर्ण काम पक्षाकडून झाले.
अजित पवार भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल ४० पेक्षा जास्त आमदारांनी सत्तेसोबत जाणे पसंत केले. त्यात सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पाठिंब्यावर करमाळ्यातून अपक्ष निवडून आलेले संजय शिंदे यांचाही समावेश होता. हे सर्व मोठे आणि शरद पवारांचे (Sharad Pawar) एकेकाळचे निकटवर्तीय पक्ष सोडून गेल्याने पवारांची राष्ट्रवादी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ओस पडली होती. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे दोनच दखल घेण्यासारखे नेते पवारांच्या सोबत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा वारं फिरलं. मागील २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे शरद पवारांनी महाराष्ट्रात पुन्हा झंझावात उभा केला. पवारांच्या नेतृत्वाचे आकर्षण आजही कायम असल्याचे लोकसभा निवडणुकीदरम्यान दिसून आले. कारण, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील आणि जयंत पाटील यांच्यात लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बोलणी सुरू झाली होती. पुढे, माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारीत डावलल्यानंतर खुद्द मोहिते पाटील (Mohite Patil) यांच्याकडूनही शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय झाला. माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या कार्यकारिणीवर निमंत्रित म्हणून नियुक्ती झालेले विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढे विजयदादांनी पवारांच्या प्रत्येक सभेत हजेरी लावत पवारांसोबतचा दोस्ताना पुन्हा जागवला.
त्याचवेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनीही मुंबईत जाऊन जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसांनी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या पुढाकारातून देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे संजय क्षीरसागर यांना गळाला लावण्याचे काम केले. त्यानंतर माजी आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला असतानाच इकडे पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड देत मतदारसंघातील प्रभावशाली नेतृत्व असणारे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांना गळा लावण्याचे महत्त्वपूर्ण काम या निवडणुकीत केले. लोकसभेला मोहिते पाटील यांच्यासाठी बेरजेचे राजकारण करतानाच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उत्तम जानकर यांची उमेदवारी ही फिक्स करून टाकली.
माढा लोकसभा मतदारसंघातील या मोठ्या नेत्यांसोबतच सोलापूर जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे नेतेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सामील झाले आहेत. लोकसभेच्या अगोदर ओस पडलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीत पुन्हा बहर आला आहे. त्याला पवारांचे नेतृत्व जेवढे कारणीभूत आहे, तेवढेच स्थानिक राजकीय समीकरणांचा भागही महत्वाचा आहे.
अभिजित पाटील यांना नाइलाजास्तव साथ सोडावी लागली!
माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम होत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना मात्र कारखान्याच्या समस्येमुळे पवारांची साथ सोडावी लागली आहे. ऐन लोकसभेच्या धामधुमीत विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आणि कारखाना वाचविण्यासाठी अभिजित पाटील यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.