
New Delhi, 07 December : गेली तीन ते साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुका घेण्यावर असलेल्या निर्बंधांसंदर्भात समाधानकारक कारण नसेल तर निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी महत्वपूर्ण टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील एका सुनावणीत केली.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील (Local Body Election) निर्बंध उठविण्यासाठी ‘ईशाद’ या ‘एनजीओ’कडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले होते.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण आदेश दिल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतीलही महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आदींच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ईशाद या संस्थेच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश आहेत. प्रत्येक राज्यातील कारणमीमांसा आणि परिस्थिती वेगळी आहे, अशी टिपण्णीही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
निवडणुका घेण्यावर घातलले निर्बंधांसंदर्भात समाधानकारक कारण नसेल, तर निवडणूक घेण्याचे आदेश देऊ, असे महत्वपूर्ण निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नाेंदविले आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, तर देशातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासंदर्भात भाष्य केले होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात, अशी आम्हालाही अपेक्षा आहे. सदृढ लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं हे अत्यंत चुकीचं आहे, असे फडणवीस यांनी म्हटले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मी राज्य सरकारच्या वकिलांशी बोललो आहे. तुम्ही ‘अर्ली हेअरिंग’चा अर्ज करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर असलेला ‘स्टे’ लवकरात लवकर हटवा, अशी विनंती न्यायालयाला करावी, असे मी राज्य सरकारच्या वकिलांना सांगितले आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.