
Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले होते. त्यानंतर सत्तास्थापन करीत महायतीने आघाडी घेतली आहे. चार महिन्यापूर्वी राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर आता विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या मध्ये भाजपच्या तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एक अशा एकूण पाच जागेसाठी निवडणूक होणार आहे. महायुतीमधील तीनही पक्षात या पाच जागासाठी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत असून त्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यात होत असलेल्या या निवडणुकीत पाचही जागांवर विजय मिळवण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. दुसरीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने महविकास आघाडी (MVA) निवडणूक रिंगणात कसा टिकाव धरणार? याची उत्सुकता असताना या पाच जागांच्या पोटनिवडणुकीत फोडाफोडी, घोडेबाजार टाळण्यासाठी महायुतीने रणनिती ठरवली आहे. या रिक्त जागांसाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक आहेत. इच्छुकांची मांदियाळी मोठी असल्याने कुणाला आमदारकीची लॉटरी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधानपरिषदेवर असलेले भाजपचे (Bjp) आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड, शिवसेनेचे आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणार याची उत्सुकता लागली आहे.
विधानसभेत महायुतीला मोठे बहुमत आहे. त्यामुळे विधानसभा सदस्यामधून निवडून द्यायच्या या पाच जागांसाठी मोठी रस्सीखेच आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे एक-एक जागा आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडे मोठी रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून संधी मिळेल त्याचा कार्यकाळ सव्वातीन वर्षाचा असणार आहे. शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र फाटक, शितल म्हात्रे आणि चंद्रकांत रघुवंशी यांची नाव चर्चेत आहेत. त्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अजित पवार गटाकडून ज्यांना आमदारकीची संधी मिळेल त्याचा कार्यकाळ सव्वा पाच वर्षाचा असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एक जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामध्ये माजी आमदार झिशान सिद्दकी, संग्राम कोते-पाटील आणि माजी खासदार आनंद परांजपे यांची नावे चर्चेत आहेत. या तीन जणापैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
भाजपच्या वाट्याला तीन जागा आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. मात्र, भाजपकडून ज्यांना आमदारकीची संधी मिळेल त्याचा कार्यकाळ अवघ्या 13 महिन्याचा असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतील एक, दोन जणांना संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे ज्यांना जास्तीचा कालावधी हवा असल्याने ती इच्छुक असलेली मंडळी कमी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.