Mumbai News : नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर सत्तास्थापन होईपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. गेल्या तीन महिन्यात महायुतीमधील छोटे-मोठे रुसवे सोडता राज्य सरकारचा कारभार सुरळीत सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील नाराजीनाट्य पाहता महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. सरकारस्थापन होऊन स्थिरस्थावर झाले असले तरी एकनाथ शिंदे यांची नाराजी लपून राहिलेली नाही.
उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयांवर चौकशी सुरू झाली आहे. तर, काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. या सगळ्यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यातच अधिवेशन काळातच धनंजय मुडेंच्या राजीनाम्याने अडचणीत सापडलेल्या महायुती सरकारसाठी आणखी एक धक्का देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले. त्यानंतर महायुतीमधील तीन पक्षात सत्ता वाटपाच्या मुद्यावरून त्यावेळेस पासून या-ना त्या कारणाने धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. महायुतीच्या सरकारमध्ये खाते वाटपानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेमध्ये (Shivsena) नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवसापासून सुरू झाले आहे. या अधिवेशन काळात मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. अशातच या विधीमंडळ अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे हे विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून पूर्णपणे अलिप्त राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील तिन्ही खात्या संदर्भातील विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची जबाबदारी शिवसेनेच्या इतर मंत्र्यांकडे दिली आहे. त्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.
अन्य मंत्र्यांकडे सोपवली जबाबदारी
अधिवेशनाच्या कामकाजापासून उपमुख्यमंत्री शिंदे अलिप्त राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजातून अलिप्त राहणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेल्या तीन खात्या संदर्भातील विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची जबाबदारी शिवसेनेच्या इतर मंत्र्यांकडे दिली आहे. त्यांनी नगरविकास खात्या संदर्भातील प्रश्नांची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवली आहे. सार्वजनिक उपक्रम एमएसआरडीसीच्या संदर्भातील उत्तरांची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांच्याकडे आहे. तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी ही पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे शिंदे हे या अधिवेशनापासून अलिप्त राहणार असल्याचे दिसत आहे.
महायुतीमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची रंगली चर्चा
एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गेल्या सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या काही निर्णयांवर चौकशी लावली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्याचे निर्णय संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही निर्णय हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहेत. गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे, असे म्हटले जात आहे.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आमच्यात कसलही कोल्डवॅार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही अधिवेशन कामकाजातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलिप्ताच्या निर्णयावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील बदललेले हे राजकारण भविष्यात कोणत्या दिशेने जाणार याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सर्वांना याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.