

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला. या जीआरमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल जल्लोषही करण्यात आला. परंतु या जीआरची अंमलबजावणी संथ गतीने सुरू असल्याचा आरोप आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार केला. नोंदी शोधल्या जात नाहीत, कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जात नाही, ज्यांना दिले त्याला वैधता दिली जात नाही, यासह अनके आरोप जरांगे पाटील यांनी केले. नव्याने आंदोलनाचा इशारा जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार दिला जात होता. आता जरांगे पाटील यांनी ३० मे पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पण जरांगे पाटील यांच्या या उपोषणाचा संबंध आता सत्ताधारी शिवसेनेसोबत जोडला जात आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांनी अंतरवाली सराटीत जाऊन 28 एप्रिल 2026 रोजी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये तासभर चर्चा झाली होती. या भेटीनंतर दोन आठवड्यातच मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून अंतरवालीत उपोषणाची घोषणा केली आहे. आता सामंत आणि जरांगेंच्या या भेटीचे कनेक्शन या आंदोलनाशी जोडले जात आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात टिप्पणीही केली आहे.
याच भेटीत सामंत यांनी जरांगे पाटील यांना शिवसेनेकेडून विधान परिषेदच्या उमेदवारीची ऑफर दिली गेल्याच्याही चर्चांना उधाण आले होते. त्या काळात विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर विविध राजकीय समीकरणांची चर्चा सुरू होती. शिवसेनेकडून काही सामाजिक चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात होता. जरांगे यांच्या चाहत्याकडून मात्र मनोज जरांगे पाटील यांनी समाजासाठी आमदारकी नाकारल्याचे समाज माध्यमांमधून सांगितले गेले.
तेव्हा जरांगे पाटील यांचे आंदोलन शांत करण्यासाठी किंवा त्यांना मुख्य प्रवाहातील राजकारणात आणण्यासाठी अशी ऑफर दिल्याचे सांगितले गेले. पण मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आपण कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे आणि मराठा आरक्षण हाच आपला मुद्दा असल्याचे जाहीरपणे सांगीतले होते. जेव्हा शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा या चर्चांवर पडदा पडला होता.
आता मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीतून 30 मे पासून पुन्हा उपोषणाची घोषणा केली आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवर्जून उल्लेख केला. मराठा समाजाला नोंदीनुसार कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी शिबीरे आयोजित केली होती, तशी सरकार का लावत नाही? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. एकनाथ शिंदे यांचे कौतुक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याने जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाबद्दल तर्क लढवले जात आहेत.
उदय सामंत-मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीत या आंदोलनाविषयी काही चर्चा झाली होती का? अशी शंका उपस्थितीत केली जात आहे. कारण या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, या संदर्भात दोन आठवड्यानंतरही कोणी बोलले नाही. उदय सामंत यांनी ही 'राजकीय भेट नव्हती' एवढेच स्पष्टीकरण या भेटीनंतर दिले होते. पण आता जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केल्याने सामंत आणि जरांगे भेटीचे कनेक्शन या आंदोलनाशी जोडले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.