
Shivsena : आमदार भास्कर जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतेच आता थांबावसं वाटतं असं म्हणत निवृत्तीचेही संकेत दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपद न मिळाल्याने आणि आता विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जाते. अशात त्यांनी एका मुलाखतीत 'शरद पवार यांना सोडणं ही माझी चूक होती', अशी जाहीर कबुलीच दिली. त्यामुळे जाधव हे पुन्हा पवार यांच्याकडे परतणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
पण शरद पवार यांना सोडणं खरंच भास्कर जाधव यांची चूक होती का? पवार यांनी भास्कर जाधव यांच्यासाठी काय काय केले? हेच जाणून घेऊया...
भास्कर जाधव यांचा स्वभाव पूर्वीपासूनच आक्रमक. भाषाही तिखट. याच स्वभावाप्रमाणे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आकर्षित झाले. 1984 च्या दरम्यान त्यांनी शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. तो काळ म्हणजे शिवसेनेचा तारुण्याचा काळ होता. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. धडाडीचे कार्यकर्ते पक्षात येत होते.
1990-91 मध्ये भास्कर जाधव यांना जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध लागले. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरु केली. पण त्याचवेळी त्यांना समजले की काँग्रेसमधून पंडित गुरुजी आले तर त्यांना तिकीट दिले जाणार. ते आले नाहीत तर भास्कर जाधव यांना मिळणार. त्यांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला. मनोहर जोशी यांनीही भास्कर जाधव या मराठा चेहऱ्याला उमेदवारी नको या मताचे होते. पण बाळासाहेब ठाकरे यांनी भास्कर जाधव यांनाच तिकीट दिले. 1992–95 या काळात ते पहिल्यांदा शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य झाले.
त्यानंतर 1995आणि 1999 या काळात ते चिपळूण विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा विजयी झाले होते. 2004 मध्ये मात्र भास्कर जाधव यांचे तिकीट कापण्यात आले. त्यावेळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष असलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या एका सर्व्हेत भास्कर जाधव यांचा पराभव होणार असा अंदाज वर्तवण्यात आल्याने त्यांचे तिकीट कापण्यात आल्याचे सांगण्यात येते. याशिवाय नारायण राणे यांच्याशी असलेल्या स्पर्धेतूनही जाधव यांना बसवण्यात आल्याच्या चर्चा तेव्हा होत्या.
याबाबत भास्कर जाधव हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले. पण त्यावेळी त्यांना ताटकळत ठेवले आणि ठाकरेंची भेट झालीच नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली पण यश आले नाही. पुढे जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथून त्यांचा उत्कर्षाचा काळ पुन्हा सुरु झाला. शरद पवार यांना कोकणात रायगडच्या पुढे जम बसवता येत नव्हता. तिथे भास्कर जाधव उपयुक्त ठरणार होते. त्यामुळे शरद पवार यांनीही त्यांना ताकद दिली.
भास्कर जाधव यांना प्रदेश महासचिव नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 2006–2009 मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. 2009 मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम व भाजपचे (BJP) बंडखोर उमेदवार विनय नातू यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2009-2013 या काळात विविध खात्यांचे राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी सांभाळले.
2013–2014 या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भास्कर जाधव यांचा मान आणखी वाढला. छगन भुजबळ, आर. आर. पाटील, मधुकरराव पिचड या नेत्यांच्या यादीत जाधव यांना स्थान मिळाले. 2005 ते 2014 हा काळ भास्कर जाधव यांनी सत्तेची चव चाखली. विधान परिषद, विधानसभा आमदार, राज्य मंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून ते सत्तेत राहिले. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने निर्णय प्रक्रियेत होते.
पण भास्कर जाधव यांचे आणि कोकणातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फारसे जमत नव्हते. रायगडमधील सुनील तटकरे, रत्नागिरीतील रमेश कदम, शेखर निकम, उदय सामंत विरुद्ध भास्कर जाधव असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चित्र होते. अशात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सुनील तटकरे यांच्याकडे आले. त्यामुळे भास्कर जाधव अस्वस्थ झाले. त्यांनी शिवसेनेसोबत पुन्हा जुळवून घेतले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2019 मध्ये परत गुहागरमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले.
पण 2019 पासून भास्कर जाधव यांचे फासे उलटे पडत गेले. शिवसेनेत त्यांचा मंत्रिपदासाठी नंबर लागला नाही. सुनील तटकरे, उदय सामंत अशा नेत्यांनी जाधव यांच्या मंत्रिपदाला विरोध केल्याचे बोलले जाते. साथ सोडल्याने दुखावलेल्या शरद पवार यांनीही त्यांच्या मंत्रिपदाविरोधात कौल दिल्याचे सांगितले जाते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधिमंडळातील नेते आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.